नवी दिल्ली – कच्छच्या रणात पाति पाकिस्तान सीमेवर आपल्या पथकासह गस्त घालत असता एप्रिल 1997 पासून बेपत्ता असणाऱ्या कॅप्टन संजित भट्टाचार्यजी यांच्या आईने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायलयाने शुक्रवारी मान्यता दिली.
देशाचे सरन्यायधिश एस. ए. बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने कमला भट्टाचार्यजी यांनी दाखल केलेल्या याचिकांवर संरक्षण मंत्रालय आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. या खंडपीठात ए. एस. बोपण्णा आणि व्ही रामसुब्रह्मण्यम यांचाही समावेश करण्यात आला आहे. अशाच बेपत्ता झालेल्या जवनांची आणखी काही प्रकरणे असतील तर ती ही न्यायालयासमोर मांडावी, म्हणजे त्याची माहितीही मागवता येईल, असे या खंडपीठाने कमला भटाजार्यजी यांच्या वकिलाला सांगितले.
कॅप्टन संजित भट्टाचार्यजी आपल्या पथकासह 19 एप्रिल 1997 ला गस्त घालण्यासाठी निघाले. त्याच्या पुढच्या दिवशी कॅप्टन आणि लान्स नाईक राम बहादूर थापा यांच्या शिवाय 15 जणांचे सर्व पथक परतले. मात्र ते दोघे अद्याप परतले नाहीत.
कॅप्टन संजित भट्टाचार्यजी यांचे वडील नोव्हेंबर 2020मध्ये मरण पावले. त्यांच्या 81 वर्षीय आईने 24 वर्ष मुलाची वाट पाहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. आपल्या मुलाचा शोध लावावा आणि तो कोठे आहे त्याची माहिती कुटुंबियांना देण्यासाठी केंद्र सरकार आणि संरक्षण मंत्रालयाला आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी ही याचिका दाखल केली आहे.
2005 मध्ये संरक्षण मंत्रालयाने कॅप्टन संजीत भट्टाचार्यजी हे मरण पावले असल्याचे कळवले. मात्र, 2010 मध्ये त्यांच्या मुलाच्या नावाचा समावेश बेपत्ता युध्दकैद्यांच्या यादीत केल्याचे राष्ट्रपती सचिवालयाने कळवले आहे. त्यांचा क्रमांक 54 असल्याचे त्यात म्हटले आहे. पाकिस्तानच्या ताब्यात 83 संरक्षण कर्मचारी आहेत. त्यांना पाकिस्तानच्या तुरूंगात डांबण्यात आले आहे. मात्र पाकिस्तान हे कबूल करत नाही.