नवी दिल्ली – शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी नव्याने स्थापन केलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीचा नवा मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा गुरुवारी म्हणजेच उद्याच शपथविधी होणार आहे. हा शपथविधी दादर येथील शिवतीर्थावर होणार आहे. दरम्यान हा शपथविधी रोखण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने मात्र याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आहे.
हिंदू महासभेचे नेते प्रमोद जोशी यांनी शिवसेना-काँगेस-राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीविरोधात ही याचिका केली होती. याचिकेत त्यांनी युती तोडून नव्या आघाडीचं सरकार बनवणं ही मतदारांची फसवणूक आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना शपथ घेण्यापासून रोखावे, अशी मागणी केली होती. मात्र न्यायालयाने याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आहे.
देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेला पुन्हा वेग आला. दिवभरातील राजकिय घडामोडीनंतर शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांसह नवनिर्वाचित आमदारांची वांद्रे येथील हॉटेल ट्रायडेंटमध्ये बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांचे ठराव मंजूर करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेतृत्वपदी म्हणजेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. एकमताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.