नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयामध्ये आज शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी झाली. महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस धाडली होती. याची मुदत आज सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी संपणार असल्याने डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार असलेल्या शिंदे गोटात चिंतेचे वातावरण होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे अपात्रतेची कारवाई आता १२ जुलै पर्यंत टळली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी पुढील सुनावणी ११ जुलैला होईल असे सांगितले आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान शिंदे गटाची बाजू मांडणाऱ्या वकिलांना तुम्ही उच्च न्यायालयात का गेला नाहीत? असा सवाल केला. यावर वकिलांनी संजय राऊत व इतर सेने नेत्यांच्या वक्तव्यांचे दाखले देत मुंबई उच्च न्यायालयात जाणे सध्या आमच्या पक्षकारांसाठी सुरक्शित नसल्याचा दावा केला.
सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर निर्णय देताना आमदारांच्या सुरक्षेचा मुद्दा हा राज्य सरकारची जबाबदारी असल्याचे म्हंटले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचे वकील चिटणीस यांच्याकडून आमदारांच्या मालमत्ता व जीवितास कोणताही धोका होणार नाही अशी हमी घेतली.
चिटणीस यांनी, “आंदरांच्या मालमत्ता, स्वातंत्र्य व जीवितास कोणताही धोका होणार नाही यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.” अशी माहिती न्यायालयात दिली.