अतुल भोसले यांचे प्रचार सभेत आवाहन
कराड – गेल्या पाच वर्षात केंद्रात व राज्यात भाजप सरकार आहे. सरकारच्या माध्यमातून विविध विकासकामांच्या योजना मी मतदारसंघात आणल्या आहेत. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदारसंघात कोणतेही विकासकाम केलेले नाही. अशा निष्क्रिय विरोधकांवर न बोलता आम्ही विकासावर बोलणार आहोत. जनतेने निष्क्रिय विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता, सर्वांगीण प्रगतीसाठी भाजपला साथ द्यावी.
वडगाव हवेली ता. कराड येथे प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मदनराव मोहिते, कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनील पाटील, कृष्णा कारखान्याचे संचालक शिवाजीराव जाधव, म्हाडाचे संचालक आनंदराव मोहिते, जि. प. सदस्या प्रियांका ठावरे, उपसरपंच राजेंद्र थोरात, धनाजी पाटील, विजय जगताप, पांडुरंग जगताप, वसंत जगताप, बंटी जाधव उपस्थित होते.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, देशातल्या सर्वसामान्यांनी मोदींजींच्या हातात देशाची सूत्रे सलग दोनवेळा सोपविली आहेत. मोदींजींनी लोककल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविल्या. यात प्रामुख्याने जनधन योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, उज्ज्वला गॅस योजना या योजना जनतेला दिलासा देत आहेत. केंद्राप्रमाणेच राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक योजना राबविल्या आहेत.
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जलयुक्त शिवारसारखी योजना राबवून लोकांचे अश्रू पुसण्याचे काम केले आहे. मराठा आरक्षण देवून मराठा समाजाला न्याय देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दलही सकारात्मक भूमिका घेऊन त्यांना दिलासा दिला आहे. सरकारने शेतीमालाला योग्य भाव, ऊस उत्पादनांना चांगला दर, ठिबक सिंचनाला अनुदान यासारखे शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्क्याने निवडून द्या, असे आवाहन केले. यावेळी मदनराव मोहिते, जगदीश जगताप यांनी मनोगते व्यक्त केली.