“आशा’ प्रकल्पांतर्गत 300 संगणक, 800 “स्वयंसिद्धा’, सव्वा कोटींच्या सायकलींचे वाटप
संतोष पवार
सातारा – पुणे येथील परिवर्तन सामाजिक संस्थेच्यावतीने गेल्या 10 वर्षांपासून शिक्षण आणि विद्यार्थी यांना केंद्रबिंदू मानून परिवर्तन सायकल अभियानांतर्गत एक कोटी 25 लाख रुपयांच्या सायकल वाटप, सातारा जिल्ह्यात “आशा’ प्रकल्पांतर्गत 300 संगणक, शारीरिक व मानसिक बदलांबाबत स्वयं-साक्षर करणाऱ्या 800 “स्वयंसिद्धा’ या अभिनव संचाचे वाटप करण्यात आले आहे. गरीब, निराधार विद्यार्थ्यांना परिवर्तन संस्था आधार ठरत आहे.
परिवर्तन सायकल अभियानांतर्गत परिवर्तन संस्थेच्यावतीने आत्तापर्यंत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुकर आणि सहज करण्यासाठी 1 कोटी 25 लाख रुपये किंमतीच्या जुन्या आणि नव्या सायकल्सचे वाटप करण्यात आले आहे. परिवर्तन सायकल बॅंक या योजनेअंतर्गत पुण्यात स्पर्धा-परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसे वाचावेत, या दृष्टिकोनातून सायकल्सचे वाटप करण्यात आले आहे. आजपर्यंत संस्थेच्यावतीने तीन हजार सायकल्सचे वाटप करण्यात आले आहे. त्यातील एस. बालन समूहाच्या मदतीने सातारा जिल्ह्यात 750 सायकलचे वितरण ग्रामीण भागातील गरजू मुलांना केले आहे.
पुनित बालन यांच्यासारख्या दानशूर व्यक्तींमुळे गरीब, निराधारांना मदत होत आहे. भविष्यातही हा उपक्रम आणखी गतीने राबवण्याचा संस्थेचा मानस आहे. परिवर्तन सायकल अभियानांतर्गत सर्व प्रकारच्या जुन्या व वापरात नसलेल्या सायकल्स संस्थेला देण्याचे आवाहन करण्यात येते. या सायकल्स दुरुस्त, नीटनेटक्या करुन ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येतात.
राज्यस्तरीय परिवर्तन युवा परिषद या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील निवडक 300 सामाजिक जान आणि भान असणाऱ्या युवकांना सर्वच क्षेत्रातील सर्जनशील नेतृत्वाचा बोध व्हावा,यासाठी दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात येते. 2017 व 2018 च्या परिषदा पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात पार पडल्या आहेत. परिवर्तन संस्थेच्या विद्यार्थी आधार योजनेअंतर्गत गरीब आणि अनाथ मुलांना शिष्यवृत्ती देण्यात येत आहे.
“आशा’ प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी एक आश्वासक पाऊल या माध्यमातून उचलण्यात आले आहे. दुर्गम भागातील शाळांना संगणक कनेक्ट मिळावा आणि तेथील प्रत्येक विद्यार्थी संगणक साक्षर व्हावा, या उद्दिष्टातून 300 संगणकाचे (किंमत 60 लक्ष रुपये) वाटप करण्यात आले. “आशा’ प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील किशोर अवस्थेतील मुलींना वयात येतांना होणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलांबाबत स्वयं-साक्षर करणाऱ्या 800 ‘स्वयंसिद्धा’ या अभिनव संचाचे (किंमत 7 लाख रुपये) वाटप करण्यात आले आहे.
परिवर्तन सेवा कॅन्टीन या उपहार गृहाची निर्मिती परिवर्तनचे बीड जिल्हा समन्वयक सोनाजी उर्फ बाप्पा बहिर यांनी बीड येथे केली. त्या माध्यमातून गरजू आणि गरीब लोकांना 30 रुपयात पोटभर जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशाच प्रकारचा उपक्रम राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात करण्याचा संस्थेचा मानस आहे. भविष्यातही शिक्षण क्षेत्राला केंद्रस्थानी ठेवून असे अभिनव प्रकल्प राबिवण्यासाठी आणि शाश्वत शिक्षणाचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने कार्यरत राहण्याच्या मानस संस्थेच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील 10 विद्यार्थी दत्तक
परिवर्तन आधार योजना या प्रकल्पांतर्गत बीड जिल्ह्यातील म्हाळसजवला आणि परिसरातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील 10 विद्यार्थी शिक्षणासाठी दत्तक घेतले आहेत. त्याअंतर्गत त्यांना दरमहा रुपये 750 रुपये इतकी रक्कम शैक्षणिक कामासाठी दिली जात आहे. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची माहिती संकलित करुन भविष्यात आणखी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी संस्था पुढाकार घेणार आहे.
साताऱ्यात बुधवारी 600 सायकलचे वाटप
परिवर्तन सामाजिक संस्था आणि एस बालन समूह पुणे यांच्यावतीने बुधवारी (दि. 18) रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात ग्रामीण भागातील गरीब, निराधार मुलांना 600 सायकलचे वाटप मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. साताऱ्यात किशोर ढगे, सचिन जगताप आदी सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत आहेत. संस्थेच्यावतीने गरजवंत विद्यार्थ्यांची निवड करुन हा उपक्रम राबवण्यात येतो.