भारतात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आज “जनता कर्फ्यू’चे आवाहन केले आहे. देशातील प्रत्येक नागरिकांकडून या आवाहनाला पाठिंबा मिळत आहे. तसेच बॉलीवुडमधील कलाकारांनीही ट्वीट करत या मोहिमेचे समर्थन केले आहे. बीग बी अर्थात महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्वीट केले की, मी जनता कर्फ्यूचे समर्थन करतो. त्याचबरोबर, आवश्यक सेवा सुरू ठेवणाऱ्या देशातील लोकांना मी सलाम करतो. एक व्हा, सुरक्षित रहा आणि काळजी घ्या.
अभिनेता अक्षय कुमारने लिहिले की, पंतप्रधान मोदींचा हा स्तुत उपक्रम आहे. आपण सर्वांनी रविवारी सकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत जनता कर्फ्यू पाळला पाहिजे. आपण सर्वांनी हे जगाला दाखवून दिले पाहिजे की आम्ही हे करून दाखविले.
अजय देवगणने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, पंतप्रधानांनी देशाती नागरिकांना “कोविड-19’च्या विरोधात संकल्प व संयमाने लढा देण्याचे आवाहन केले आहे. 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूचे अनुसरण करा आणि घरामध्येच रहा. सुरक्षित रहा. याशिवाय हेमा मालिनी, शबाना आझमी, आयुष्मान खुराना, कपिल शर्मा, करण जोहर आदी कलाकारांसह अनेक जणांनीही ट्विटद्वारे जनता कर्फ्यूचे समर्थन केले आहे.