राजगुरूनगर- येथील आधार केंद्रावर आधारकार्ड पॅन कार्ड काढण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. तालुक्यात आतापर्यंत 100 पेक्षा अधिक गर्भवती महिलांचे शासनाच्या मातृ वंदना योजनेनंतर्गत मोफत आधारकार्ड काढण्यात आले असल्याची माहिती आपले सरकार, महाईसेवा केंद्राच्या संचालिका शुभांगी शिंदे-शेख यांनी दिली.
नियती फाउंडेशन आळंदी व शेख इंटरप्रायझेस आपले सरकार महाईसेवा केंद्राच्या माध्यमातून राजगुरूनगर येथील केंद्रावर निराधार, महिलांना आधार, पॅन व रेशनकार्ड देण्यासाठी खास मोहीम राबविण्यात आली असून आतापर्यंत तालुक्यातील 600 महिला व तालुक्यासह जिल्ह्यातील 300 पेक्षा अधिक तृतीयपंथी नागरिकांना आधारकार्ड पॅन कार्ड नियती फाउंडेशनच्या माध्यमातून काढून देण्यात आले आहे. येथील शेख इंटरप्रायझेस आपले सरकार महाईसेवा केंद्राच्या संचालिका शुभांगी शिंदे-शेख, नियती फाउंडेशनच्या माध्यमातून चऱ्होली, आळंदी, वडगाव रस्ता व तालुक्यातील अन्य भागातील निर्धार, विधवा महिला यांना आधार कार्ड काढून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. खेड तालुक्यात 9 महाईसेवा केंद्र असून त्यापैकी सात केंद्रांवर काम सुरू असून राजगुरूनगर येथील केंद्रावर तालुक्यातील नागरिकांची महिलांची मोठी गर्दी आहे.
येथील केंद्रावर आळंदी परिसरातील सुमारे 100 पेक्षा जास्त महिला आधार कार्ड काढण्यासाठी आल्या होत्या. महाईसेवा केंद्राच्या शुभांगी शिंदे-शेख, युसूफ शेख, रेखा कळसकर, मीरा नागरगोजे, उज्वला भंगाळे, छाया डुकरे, कमल झंझारे, अनुराधा तेलंग, अंजली नागरगोजे, विकास शिंदे, गणेश कोळेकर, कावेरी आंधळे, मीना राजगुरू, शांता रणक्षेत्रे या सामाजिक कार्यकर्त्यांनी तालुक्यातील निराधार महिलांचे आधार कार्ड काढण्यासाठी मदत केली.
- खेड तालुक्यातील निराधार, विधवा, ज्येष्ठ महिला व तृतीयपंथी व्यक्तींकडे रहिवासीचे कोणतेही पुरावे नसल्याने फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना आधार कार्ड, पॅन कार्ड बॅंकेत खाते आणि रेशनकार्ड देण्यासाठी काम केले जात आहे. यापुढील काळात या निराधार महिलांना हक्काचे घर व घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
-नियती शिंदे, संस्थापक अध्यक्ष, नियती फाउंडेशन