आघाडी सरकारच्या माध्यमातून आणखी ५०० कोटीचा निधी आणण्याकरीता प्रयत्नशील
पाचगणी (प्रतिनिधी) : ब्रिटीशांनी उभारलेल्या निसर्गरम्य महाबळेश्वरकरिता ठोस असे काहीच झाले नाही. महाबळेश्वरचा उदरनिर्वाह पर्यटनावर अवलंबून असल्यामुळे भविष्यात पर्यटक संख्या वाढीकरीता महाबळेश्वरचा सुशोभीकरणाचा प्रस्तावाला महाळेश्वरकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी केले.
महाबळेश्वर येथील मधुशाळा येथे सुशोभिकरणासाठी मिळकतधारक व प्रशासनाच्या बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले ”महाबळेश्वरच्या विकासाकरीता महाविकास आघाडी सरकारकडून कोणताच अडथळा नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वरचे सुशोभिकरणाचा महत्वाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रथम साबणे रोडचा सुशोभीकरण आरखडा तयार करण्यात आला आहे. निसर्ग अबाधित ठेवत वाई- पाचगणी- महाबळेश्वर रस्ता रुंदीकरणाचा टप्पा सार्वजनिक बाधकाम विभागाकडून मार्गी लावण्यात यश आले आहे.” आघाडी सरकारच्या माध्यमातून महाबळेश्वरच्या सुशोभिकरणासाठी आणखी ५०० कोटीची तरतूद मिळवण्याकरीता प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी दिली .
साबणे रोडच्या सुशोभिकरणात चार ते पाच फूट रुंदीकरण अपेक्षित असून स्थानिक व्यापारी वर्गाने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले. नो हाॅकर्स झोन म्हणून साबणे रोड विचाराधीन असुन नगरपालिकेच्या माध्यमातून लवकरच निर्णय घेणार, पार्किंगकरीता पंचायत समिती, तसेच वन विभागाच्या शहरातील पाच भूखंडाचे नवीन प्रस्ताव शासनाकडे सादर करुन नवीन पार्किंग व्यवस्था उभारणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सुशोभिकरणाचा आराखड्याचे प्रदर्शन यावेळी पंकज जोशी यांनी केले तर यावेळी प्रांताधिकारी संगीता राजापुरकर, तहसीलदार सुषमा पाटील, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, नगराध्सक्षा स्वप्नाली शिंदे, उपनगराध्यक्ष अफजलभाई सुतार, सहाय्यक संचालक विलास वाघमोडे यांच्यासह नगरसेवक व नगरसेविका तसेच साबणे रोडवरील मालमत्ताधारक उपस्थित होते.
मुख्यमंत्र्याना दिलेला शब्द एका वर्षात पूर्ण करणार : शेखर सिंह
महाबळेश्वरचे सुशोभिकरण करण्याचा प्रकल्प मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हाती घेतला आहे. महाबळेश्वरचे सुशोभिकरण एका वर्षात पूर्ण करणार असल्याचा शब्द त्यांना दिला आहे. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता महाबळेश्वरवासियांनी प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.