-कल्याणी शंकर
करुणानिधी आणि जयललिता यांच्या निधनानंतर करिष्मा असणारा नेता द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन्ही पक्षांत राहिलेला नाही. शशिकला 2021 च्या निवडणुकीपूर्वी तुरुंगातून सुटणार असल्या तरी आगामी सहा वर्षे त्या निवडणूक लढवू शकणार नाहीत. कमल हासन यांना लोकसभा निवडणुकीत मिळालेले अतिशय मर्यादित यश पाहता, सुपरस्टार रजनीकांत यांच्या पक्षाला किती प्रतिसाद मिळेल याचाही अंदाज येत नाही. परंतु रजनीकांत यांना जर राजकारणात उतरायचे असेल, तर आताच संधी आहे.
पुढील वर्षाच्या सुरुवातीला तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक होत असून, निवडणुकीला काही महिनेच उरले असल्याने सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षाने त्यासाठी तयारी सुरू केली आहे. सर्वप्रथम सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षाने अंतर्गत समस्या सोडविण्यास सुरुवात केली आहे. पक्षाचे पहिले उद्दिष्ट मुख्यमंत्रिपदासाठी सध्याचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी अर्थात “ईपीएस’ यांच्या नावाची घोषणा करणे हे असून, या पदासाठीचे दुसरे दावेदार आणि सध्याचे उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम अर्थात “ओपीएस’ यांना दूर करणे हे दुसरे उद्दिष्ट आहे. 2021 मधील तमिळनाडूची निवडणूक आणखी एका कारणासाठी महत्त्वपूर्ण आहे. ते म्हणजे, एम. करुणानिधी आणि जयललिता हे दोन्ही दिग्गज नेते लोकांना दिसणार नाहीत, अशी ही पहिलीच निवडणूक आहे. अण्णा द्रमुक आणि द्रमुक या दोन्ही पक्षांच्या सध्याच्या नेतृत्वासाठी ही सत्त्वपरीक्षाच असणार आहे. वास्तविक, करिष्मा घडवून आणेल असा नेता दोन्ही पक्षांकडे नाही. त्याचप्रमाणे तमिळनाडूत आतापर्यंत कोणत्याही पक्षाने विजयाची “हॅट्ट्रिक’ केलेली नाही.
अर्थात, निवडणुकीत स्पर्धा दोन प्रमुख द्रविडी पक्षांमध्येच असल्यामुळे या निवडणुकीला काही महत्त्वाचे पैलूही आहेत. महत्त्वाचा फॅक्टर आहे तो शशिकला नटराजन यांचा. दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या त्या निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी असून, त्या सध्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याप्रकरणी चार वर्षांचा तुरुंगवास भोगत आहेत. फेब्रुवारी 2021 मध्ये त्या तुरुंगातून बाहेर येत आहेत. त्यांच्याकडे राजकीय करिष्म्याबरोबरच अफाट संपत्तीही आहे. त्यामुळे कारागृहातून बाहेर पडल्याबरोबर एक तर त्या अण्णा द्रमुकची सूत्रे आपल्या हाती घेऊ शकतात किंवा त्यांचे पुतणे टी. टी. व्ही. दिनाकरन यांच्याशी हातमिळवणी करू शकतात. दिनाकरन यांनी अण्णा मक्कल मुन्नेत्र कळघम नावाचा नवा पक्ष स्थापन केला आहे. शशिकला यांनी आपले पत्ते खुले ठेवले आहेत. “चिन्नमा’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या शशिकला यांचे अनेक निकटवर्ती अण्णा द्रमुकमध्ये आहेत. कारण जयललिता यांच्या कारकिर्दीत शशिकला या पक्षातील एक वजनदार नेत्या होत्या.
शशिकला यांचा राजकारणातील पुनःप्रवेश अनेक घटनांना जन्म देणारा ठरेल. त्यातल्या त्यात समाधानाची बाब अशी की, कायद्यानुसार पुढील सहा वर्षे शशिकला स्वतः निवडणूक लढवू शकणार नाहीत. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकने शशिकला यांना समर्थन दिले; परंतु त्यांना तुरुंगात जावे लागल्याने ई. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटित झाला. आपल्या सरकारने अनेक क्षेत्रांत चांगले काम केले असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा असून, त्यात कोविड-19 च्या साथीत केलेल्या कामाचाही समावेश आहे. ईपीएस यांनी स्वतःची स्थिती सरकारमध्ये आणि पक्षामध्ये सुदृढ केली आहे. दुसरी गोष्ट अशी की, चिन्नमा यांनी थेवर समुदायाचे सशक्तीकरण केले होते. या समुदायावर आजही त्यांची पकड कायम आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिसरी गोष्ट अशी की, वेळ आल्यास शशिकला अण्णा द्रमुकमध्ये फूट पाडू शकतात आणि मुख्यमंत्र्यांशी मतभेद असणाऱ्यांना आपल्यासोबत घेऊ शकतात.
चौथी गोष्ट अशी की, अण्णा द्रमुक अनेक आघाड्यांवर संकटांचा सामना करीत आहे. यात सत्ताविरोधी लाट, अंतर्गत अस्थिरता, करिष्मा असणाऱ्या नेत्याची कमतरता तसेच द्रमुककडून असलेला धोका आदी बाबींचा समावेश आहे. ईपीएस यांच्या सरकारला मोदींचा आशीर्वाद आहे, असे द्रमुक मानतो. दिल्लीतून भाजपने आतापर्यंत अण्णा द्रमुकला नियंत्रित केले आहे. ईपीएस यांचे केंद्र सरकारबरोबर चांगले संबंध आहेत. शशिकला किंवा त्यांच्या भाच्यासोबत कोणत्याही प्रकारचे संबंध जोडण्यास भाजपला अजिबात रस नाही. गेल्या महिन्यात शशिकला यांच्या मालमत्तेवर अचानक पडलेले छापे भाजपचे मनसुबे स्पष्ट करणारे आहेत. सुमारे 64 मालमत्तांवर टाच आली आहे. पोइस गार्डन येथे जयललिता यांच्या निवासस्थानासमोर असलेल्या जागेत राहण्याची शशिकला यांची योजना आहे. सध्या तेथे बांधकाम सुरू आहे.
निवडणुकीला लाभलेला आणखी एक अज्ञात कोन म्हणजे सुपरस्टार रजनीकांत यांची एन्ट्री! रजनीकांत हे त्यांच्या फॅन क्लबवर अधिक अवलंबून आहेत. परंतु त्यांचा प्रस्तावित पक्ष संघटित करण्याची किंवा चालविण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 2017 मध्ये भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी त्यांना साद घातली होती; मात्र तरीही त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मार्च 2020 मध्ये त्यांनी आपल्या प्रस्तावित पक्षाची घोषणा केली आणि आपण विधानसभेच्या सर्वच्या सर्व 234 जागा लढविणार असल्याचे संकेत दिले. “रजनी मक्कल मंदरम्ज’ हा आपला पक्ष अधिकाधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नात सध्या ते गुंतले आहेत.
“मक्कल निधी मायम’ नावाचा जो पक्ष अन्य एक सुपरस्टार कमल हासन यांनी स्थापन केला आहे, त्या पक्षाशी निवडणुकीपूर्वीच आघाडी होऊ शकते, असेही रजनीकांत यांनी म्हटले होते. हे दोन्ही सुपरस्टार्सकडे तोबा गर्दी जमा करण्याची क्षमता आहे. परंतु मते मिळविण्याच्या क्षमतेविषयी अद्याप काहीच स्पष्ट होऊ शकलेले नाही. कोविड-19 मुळे रजनीकांत यांचा जनतेशी संपर्क तुटला आहे. शिवाय, कमल हासन यांच्या पक्षाचा अनुभव फारसा आनंददायी नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कमल हासन यांच्या पक्षाला अवघी दोन टक्के मते मिळाली होती आणि त्या पक्षाने एकही जागा जिंकली नव्हती.
जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर निर्माण झालेले मोठे राजकीय शून्य भरण्याचा प्रयत्न रजनीकांत यांचा आहे. एक आंदोलन सुरू करण्यासाठी ही वेळही योग्य आहे. रजनीकांत यांनी यावेळी काही केले नाही तर कधीच काही करता येणार नाही, अशी स्थिती आहे. आपल्या धोरणांसंबंधी काही दिवसांपूर्वी त्यांनी सांगितलेही होते. आपण स्वतःला मुख्यमंत्रिपदाचा दावेदार म्हणून सादर करणार नाही आणि 2021 च्या निवडणुकीत या पदासाठी एखाद्या तरुणाच्या नावाची घोषणा करण्यास प्राधान्य देऊ, असे ते म्हणाले होते. त्यांना एक कठपुतळी मुख्यमंत्री हवा असावा, असेच या वक्तव्यावरून दिसते. परंतु एक मात्र खरे की, रजनीकांत यांचा पक्ष हा तमिळनाडूच्या 2021 मधील निवडणुकीचा एक महत्त्वाचा कोन ठरू शकतो.