महानायक अमिताभ बच्चन यांना नुकतेच दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्याने मला आनंद होत आहे. मात्र, मी आता निवृत्त झालो आहे काय, असा प्रश्न उपस्थित करून अमिताभ यांनी उपस्थितांना कोड्यात टाकले. या प्रश्नाला उत्तर नाही. मात्र, त्यांनी निवृत्तीचे वय कधीच ओलांडले असून ते सर्वांच्या पुढे आहेत. पिक्चर अभी बाकी है दोस्त या शैलीत अजूनही काही काम करणे बाकी आहे, असे ते म्हणाले. गेल्या पाच दशकांत प्रचंड यश, कीर्ती, सन्मान मिळवूनही अजूनही त्यांना असाधारण काम करायचे आहे. अर्थात ते काम मागील असामान्य गोष्टीपेक्षा अधिक उच्च कोटीचे असेल, हे तितकेच खरे.
चार राष्ट्रीय पुरस्कारानंतर भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्काराने महानायक अमिताभ बच्चन यांचा गौरव होणे हा एका अर्थाने मायानगरीचाच सन्मान करण्यासारखे आहे. पाच दशकांपासून बॉलीवूडमधील सर्वात सक्रिय अभिनेते म्हणून अमिताभ बच्चन यांची ओळख आहे. वयस्क, प्रौढ, तरुण आणि मुले या चारही वयोगटातील सर्वात लोकप्रिय कलाकार म्हणून बिग बी यांचा लौकिक आहे. कामाप्रमाणेच सोशल मीडियावरही ते सतत ऍक्टिव्ह असतात. ते नियमित आणि संयमाने ब्लॉग लिहितात, वेळोवेळी जबाबदार नागरिक म्हणून ट्विट करतात आणि समाजातील घडामोडीबाबत भाष्य करतात, फेसबुकवरही त्यांची सक्रियता पाहावयास मिळते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी श्रोत्यांशी नाळ जुळवून ठेवली आहे. लोकांच्या आशा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ते सतत धडपडत असतात. मुंबईत असल्यास ते दर रविवारी चाहत्यांना घराबाहेर येऊन भेटतात. एक जबाबदार, प्रचंड अनुभवी असणारा कलाकार आपल्याला सहजपणे वावरताना दिसतो.
पाच दशकांची वाटचाल
अमिताभ बच्चन यांचे बॉलीवूडमधील योगदान पाच दशकांपेक्षा अधिक काळ राहिले आहे. ते ख्वाजा अहमद अब्बास यांच्या सात हिंदुस्थानी पैकी एक हिंदुस्थानीप्रमाणे ते पडद्यावर येतात सर्वांना मोहीत करतात. अभिनय, भारदस्त आवाज, रुबाबदार, आकर्षक संवादफेक, प्रसन्न व्यक्तिमत्त्व, चेहऱ्यावरचे हावभाव, देहबोली, चालण्याची शैली या सर्वच आघाड्यावर ते चाहत्यांना घायाळ करतात. अशा महानायकाचा शोध हा सहजासहजी लागला नाही. सलीम-जावेद ही लेखकाची जोडगोळी पटकथेच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीत नव्या महानायकाची पायाभरणी करत होते आणि त्यातूनच जंजीर आणि दीवारची निर्मिती झाली. लेखक सलीम यांनी जंजीरची एक आठवण सांगितली. जंजीर चित्रपटासाठी नायकाचा शोध सुरू असताना लेखक सलीम यांनी अमिताभ बच्चन यांची प्रकाश मेहरा यांच्याशी ओळख करून दिली. त्यानंतर अभिनेत्री जया भादुरीला नवीन आणि त्यांच्यापेक्षा कमी लोकप्रिय असलेल्या अभिनेत्यासमोर काम करण्यासाठी मनधरणी केली. एवढेच नाही तर पत्रकारांसांठी जंजीर चित्रपटाच्या एका खास शोचे आयोजन मुंबईत केले होते. तेव्हा नामवंत हिंदी कवी डॉ. धर्मवीर भारती उपस्थित होते. यावेळी अमिताभ बच्चन यांनी केलेले आदरातिथ्य कोणीही विसरू शकले नाही.
वेळेचा सदुपयोग
अमिताभ बच्चन यांच्यावर अनेक नामवंत लेखकांनी आपले विचार मांडले आहेत. त्यांच्यावर पुस्तकं लिहिली गेली आहेत. सर्वांशी त्यांचे चांगले संबंध राहिले आहेत आणि संबधात चढउतारही राहिले आहेत. त्यांच्याबाबत सकारात्मकही आणि नकारात्मकही लिहिले गेले. एवढ्या मोठ्या कारकिर्दीत अमिताभ बच्चन हे जीवघेण्या घटनेतून वाचले आणि त्याचबरोबर अनेक आजाराचा सामना करत उत्साहाने काम करत राहिले. एकदा त्यांनी पत्रकाराशी न बोलण्याचाही निर्णय घेतला होता आणि त्यावर ते ठामही राहिले होते. शेवटी कुली चित्रपटाच्या घटनेनंतर ते जुने मतभेद विसरून पत्रकारांना भेटले देखील. शिखरावरचा काळ आणि अधोगतीचा काळ हा त्यांनी अतिशय गांभीर्याने, संयमाने जगला. ते नेहमीच सर्वच क्षेत्रातील लोकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व राहिले आहे. एकेकाळी अनेक शिफ्टमध्ये काम करणारे, सतत व्यग्र राहणारे अमिताभ बचचन यांनी वयाच्या पन्नाशीत फिल्मलाइन सोडून दिली होती. नव्या पिढीच्या नायकांचा उदय होत असताना अमिताभ बच्चन साइडलाइनला गेले होते. अशा स्थितीतही त्यांनी मृत्युदाता चित्रपटाने कमबॅक केले. यादरम्यान त्यांच्यावर टीकाकारांचा मारा सुरूच होता. मायानगरीबाहेर राहिलेले अमिताभ यांनी नव्याने इनिंग सुरू करण्याचा प्रयत्न केला, परंतु पुरेसे यश मिळत नव्हते. त्यांनी वेळोवेळी स्वत:ला सांभाळले आणि मनात सुरू असलेला संघर्ष हाताळला. आपल्या लिखाणातून त्यांनी मनातील खदखद बाहेर काढली. आपण सदासर्वकाळ नायक राहू शकत नाही, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. तरीही त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्व आणि क्षमतेच्या जोरावर प्रत्येक पिढीशी कसे जुळवून घेता येईल, याचा अभ्यास केला. एका चर्चेत त्यांनी एक गोष्ट सांगितली. एकदा ते दुपारी घराच्या अंगणातच पायात स्लिपर घालून बसले होते. बॅडपॅचमुळे मनात घालमेल सुरू होती. एबीसीएल कंपनीमुळे ते अडचणीत आले होते. अशावेळी त्यांना मोठ्या बॅनरचा चित्रपट हवा होता. अचानक ते तडक उठले आणि पायात स्लिपर असतानाच यश चोप्रांच्या घरी गेले. तेथे त्यांनी चोप्रा यांना पुन्हा एकदा काम करण्याची इच्छा बोलून दाखविली. विशेष म्हणजे यश चोप्रा यांनीही बराच काळ चित्रपट निर्मिती केलेली नव्हती. शेवटी त्यांनी आपला मुलगा आदित्य चोप्राशी गाठ घालून दिली आणि त्यानंतर मोहब्बते चित्रपटासाठी अमिताभ यांना भूमिका मिळाली.
दादासाहेब फाळके पुरस्कारापर्यंतचा प्रवास
“मोहब्बते’नंतर अमिताभ यांना चित्रपट मिळत गेले. यादरम्यान कौन बनेगा करोडपती या मालिकेने अमिताभ यांचा बॅडपॅच संपला. त्यांची लहान पडद्यावरची धमाकेदार एंट्री त्यांच्या करियरला बुस्ट देणारी ठरली. या चढउतारात त्यांचा अग्निपथ सिनेमा हा मैलाचा दगड होता. 1990 रोजी त्यांना आयुष्यातील पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मुकुल एस आनंद दिग्दर्शित या चित्रपटावर टीकाही खूप झाली होती. विशेषत: अमिताभ यांचे संवाद आणि आवाजातील बदलामुळे अनेकांनी वेगवेगळी बाजू मांडली. मात्र राष्ट्रीय पुरस्काराने या महानायकाचा गौरव झाला. दुसरा राष्ट्रीय पुरस्कार ब्लॅक चित्रपटामुळे मिळाला. हा चित्रपट संजयलीला भन्साळी यांनी केला होता. या चित्रपटात त्यांनी आव्हानात्मक भूमिका पार पाडली होती. राणी मुखर्जीची भूमिका देखील विशेष राहिली. “ब्लॅक’चा देवराज सहानी हा स्वत:शीच युद्ध लढत असतो. त्या युद्धातील विजय हा प्रत्यक्षात हार असते.
अनन्यसाधारण क्षमता
अमिताभ बच्चन यांची अभिनय क्षमता अनन्यसाधारण आहे. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिका जिवंत केल्या आहेत. आर. बाल्की यांचा पा या (2009) या चित्रपटातील अभिनयाने त्यांना तिसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटातील बच्चन यांचा अभिनय अदभुत आणि विलक्षण राहिला. पिकू चित्रपटातील भास्कर बॅनर्जी पाहणे तर खूपच रंजक ठरते. वय, एकटेपणा, आजारपण आणि टीव्हीवर दाखवण्यात येणारा आधुनिक समाज याचे मिश्रण या चित्रपटात साकारले आहे. लहान मुलांप्रमाणेच जिद्दी असणारा भास्कर बॅनर्जी आपल्या मुलीला कसे भंडावून सोडत असतो, कोलकता येथील जुन्या घरचे प्रेम या सर्वच गोष्टी अतिशय सुरेखपणे साकारल्या आहेत. कोलकाता येथील सायकलफेरी हा त्यांच्या अभिनयाचा उकृष्ट नमुना मानता येईल. घरातील ज्येष्ठ आणि तरुण पिढी यातील संघर्ष, वैचारिक मतभेद असतानाही एकमेकांशी असलेली घट्ट नाळ आपण “पिकू’मधून पाहिली. शूजीत सरकार यांचा चित्रपट मनोरंजन होण्याबरोबरच अमिताभ यांच्या करियरचा हा महत्त्वाचा टप्पा ठरला. त्यानंतर बदला हा चित्रपट त्यांच्या अभिनयाच्या परिपक्वतेला आव्हान देणारा ठरला आहे.
निवृत्ती नाही
अमिताभ बच्चन यांचा सन्मान त्यांच्या कारकिर्दीच्या प्रत्येक टप्प्यावर झाला आहे. जंजीर, दीवार, अभिमान, आनंद, नमक हराम, शोले, त्रिशूल, कभी-कभी, सिलसिला, कस्मेवादे, बरसात की एक रात, जुर्माना, बेमिसाल, महान, नास्तिक, शान, कालिया, आखिरी रास्ता, डॉन, दोस्ताना, शराबी, कुली, सत्ते पे सत्ता असे कितीतरी चित्रपटाने त्यांचा लौकिक वाढला आणि सन्मान मिळाला. चौथा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना तीन वर्षापूर्वी मिळाला होता. आता त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले. हा सन्मान स्वीकारल्यानंतर त्यांनी दोन शब्दांत आपले मनोगत मांडले आणि ते खूपच रोचक होते. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याने मला आनंद होत आहे, मात्र मी आता निवृत्त झालो आहे काय? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी उपस्थितांना कोड्यात टाकले. अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नाला उत्तर नाही, मात्र त्यांनी निवृत्तीचे वय कधीच ओलांडले असून ते सर्वांच्या पुढे आहेत, हे सांगण्याची गरज नाही. तरुणाईला लाजवेल एवढी ऊर्जा आपण त्यांच्या अंगी पाहतो. व्यावसायिक जाहिरात असो, सरकारी योजनांची जाहिरात असो, सार्वजनिक उपक्रमाचा कार्यक्रम असो किंवा चित्रपट असो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोशल मीडिया. या सर्वच घटकात ते सक्रिय राहतात. पुरस्कार मिळाल्यानंतर ते जे काही म्हटले ते आपल्यासाठी आशादायक आहे. पिक्चर अभी बाकी है दोस्त या शैलीत अजूनही काही काम करणे बाकी आहे, असे ते म्हणाले. गेल्या पाच दशकांत प्रचंड यश, कीर्ती, सन्मान मिळवूनही अजूनही त्यांना असाधारण काम करायचे आहे. अर्थात ते काम मागील असामान्य गोष्टीपेक्षा अधिक उच्च कोटीचे असेल, हे तितकेच खरे.
सोनम परब