लाहोरमध्ये एकवेळ बर्फ पडेल, पण सामना होणार नाही
मुंबई – करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी भारत व पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा मदतनिधी सामना खेळविला जावा, अशी मागणी पाकिस्तानचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू रमिझ राजा, शोएब अख्तर व शाहीद आफ्रिदी यांनी केली होती. त्यावर लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी एका मुलाखतीत चांगलीच खिल्ली उडविली. एकवेळ लाहोरमध्ये बर्फ पडेल, पण या दोन संघात असा सामना होण्याची अजिबात शक्यता नाही, असा टोला गावसकर यांनी हाणला आहे.
करोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात भारत व पाकिस्तानातील अनेकांना संकटाने घेरले आहे. रोजंदारीवर काम करणारे कामगार तसेच अन्य नागरिकांना रोज दोन वेळच्या जेवणाचेही दुर्भीक्ष आहे. हा धोका कधी संपुष्टात येइल हे देखील सांगता येत नाही. अशा वेळी त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी भारत व पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना खेळवून त्यातून मिळणारा निधी अशा लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरता येईल, असे मत व्यक्त करत पाकिस्तानच्या या खेळाडूंनी सामन्याच्या आयोजनाची मागणी केली होती, त्यावर गावसकर चांगलेच भडकले.
जागतिक स्तरावर ऑलिम्पिकसह अनेक स्पर्धा पुढे तरी ढकलल्या गेल्या आहेत किंवा रद्दही करण्यात आल्या आहेत. हा निर्णय लोकांच्या भल्यासाठीच घेण्यात आला आहे. असे काही सामने पाहण्यासाठी प्रचंड संख्येने लोक मैदानात येतील मग करोनाचा धोका आणखी वाढेल. त्यामुळे केवळ सामन्यांच्या आयोजनामुळे लोकांच्या जीवाशी खेळ नको म्हणूनच असे कोणतेही सामने आयोजित करणे शक्य नाही. हे माहीत असूनही अशी मागणी पुढे येते तेव्हा हसावे की रडावे हेच कळत नाही.
एखाद्या अशक्य गोष्टीची मागणी कशी काय केली जाते याचेच आश्चर्य वाटते. त्यामुळे असे काही सामने आयोजित होऊच शकत नाहीत. एकवेळ लाहोरमध्ये बर्फ पडेल, पण असे सामने होणार नाहीत, अशा शब्दात गावसकर यांनी फटकारले आहे.