मुंबई – माजी कर्णधार व विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी विराट कोहलीला सल्ला दिला आहे. चेंडू खेळताना कोहली खूप घाई करत असून त्याने चेंडूची वाट पाहायला हवी, तरच तो या अपयशाच्या गर्तेतून बाहेर येइल, असेही गावसकर यांनी म्हटले आहे.
गेल्या काही वर्षांपासून कोहलीची फलंदाजी पाहिली आहे तसेच या काळात तो ज्या पद्धतीने बाद होत आहे, ते पाहता तो चेंडू त्याच्याकडे योण्यासाठी थांबतच नाही, त्याला चेंडू खेळण्याची खूप घाई असल्याचे दिसून आले. त्याने चेंडू त्याच्या बॅटवर येण्यासाठी काही संयम राखला तर तो लवकरच मोठी केळी करून थाटात पुनरागमन करेल, असा विश्वासही गावसकर यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, भारतीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या फॉर्मची चर्चा जोरात सुरू आहे. नोव्हेंबर 2019 पासून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावलेले नाही.
कोहली मोठा खेळाडू आहे. त्याच्याकडून प्रत्येक वेळी मोठ्या खेळीची अपेक्षा असते. आकडेवारीत विराटची टी-२० मधील कामगिरी उत्कृष्ट आहे, पण कसोटी सामन्यांमध्ये तो दीर्घकाळ मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला आहे. कोहलीने कसोटीत शेवटचे शतक 22 नोव्हेंबर 2019 रोजी तर एकदिवसीय सामन्यात 14 ऑगस्ट 2019 रोजी झळकावले होते.