रविवार म्हणजे सुट्टी, ही गोष्ट आपल्या रक्तातच भिनली आहे. ती वेगळी करता येणारच नाही. मात्र, ही रविवारची सुट्टी कशी आणि कधीपासून सुरू झाली याची नेमकी कल्पना फारशी कोणाला आहे? रविवार हा सुट्टीचा वार प्रथम जाहीर झाला त्याला सव्वाशे वर्षे होऊन गेली आहेत. पूर्वी साप्ताहिक सुट्टी हा प्रकारच नव्हता.
विशेषकरून औद्योगिक क्रांतीनंतर साप्ताहिक सुट्टी या संकल्पनेचा विचार उदयास आला. साप्ताहिक सुट्टीबरोबरच पोटपूजेसाठी “लंच टाइम’ जेवणाच्या सुट्टीचा विचारही उदयास आला. 1881 साली भारतात फॅक्टरी ऍक्ट लागू करण्यात आला.
या कायद्यात बालकामगाराचे किमान वय, त्याच्यासाठी साप्ताहिक सुट्टीची तरतूद असली तरी प्रौढ कामगार आणि महिला कामगार यांच्यासाठी तशी काहीच तरतूद नव्हती. त्यांना आठवड्याचे सातही दिवस काम करावे लागत असे. त्यामुळे साप्ताहिक सुट्टीसाठी संघर्ष सुरू झाला.
हक्काच्या सुट्टीसाठीचा हा संघर्ष तब्बल आठ वर्षे चालला. यामागे प्रयत्न होते एका मराठी माणसाचे- नारायण मेघाजी लोखंडे या कामगार नेत्याचे. नारायण लोखंडे यांनी 1884 साली मुंबईत बॉंबे मिल हॅंड्स ही भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन केली. त्यांच्या कामगार संघटनेने तत्कालीन फॅक्टरी कमिशनरकडे अनेक मागण्या केल्या. त्यातील महत्त्वाच्या काही मागण्या अशा होत्या-
जेवणासाठी रोजच्या कामातून अर्धा तास सुट्टी, रविवारची साप्ताहिक सुट्टी. या मागण्या काही सहजासहजी मान्य झाल्या नाहीत. त्यासाठी दीर्घकाळ संघर्ष करावा लागला होता. मागण्या मान्य होण्यापूर्वी काही दिवस, म्हणजे 24 एप्रिल 1890 रोजी मुंबईत हजारो कामगारांचा जोरदार मोर्चा निघाला होता. त्यानंतरच मागण्या मान्य झाल्या आणि 10 जून 1890 रोजी रविवारची साप्ताहिक सुट्टीचा श्रीगणेशा झाला.
मात्र, रविवारच्या सुट्टीचे कारण त्या काळी वेगळेच होते. एक दिवस मजा मारावी, आराम करावा, हा सुट्टीमागचा उद्देशच नव्हता. तर सहा दिवस आम्ही स्वत:साठी, कुटुंबासाठी काम करतो. एक दिवस आम्हाला आमच्या देशासाठी, समाजासाठी काही काम करण्यास वेळ मिळावा म्हणून एक दिवस सुट्टी द्यावी, अशी त्यांची मागणी होती.
आता तर पाच दिवसांचा आठवडा सुरू झाला असून शनिवार व रविवारची सुट्टी मिळू लागली आहे.
त्यामुळे म्हणायला हरकत नाही,
आना मेरी जान… मेरी जान…
संडे के संडे…