उद्योग सावरण्यासाठी पोल्ट्री उद्योजकांची शासनाकडे धाव
पुणे – करोना विषाणू चिकनमधून पसरत असल्याची अफवा प्रसारमाध्यमातून पसरविली गेल्याने राज्यातील पोल्ट्री व्यवसाय अडचणीत सापडला आहे. ग्राहकांनी चिकन व अंड्यांकडे पाठ फिरविल्याने कोंबडीचे दर 5 ते 10 रुपये किलोपर्यंत खाली कोसळले आहेत. या पार्श्वभूमीवर पोल्ट्री उद्योग सावरण्याच्या दृष्टीने तातडीने पावले टाकावीत, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. याबाबत शेतकरी संघटनेचे नेते डॉ. अजित नवल, धनंजय धोरडे यांनी शासनाला निवेदन दिले आहे. यात या व्यावसायिकांना मदत करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात नवले म्हणाले, पोल्ट्री व्यावसायिक संकटात सापडले आहेत. एक किलो वजनाची कोंबडी तयार करण्यासाठी 75 रुपये खर्च येतो. 3 किलो वाढ झालेल्या कोंबडीचा उत्पादन खर्च साधारणपणे 295 रुपये असतो. अशा परिस्थितीत कोंबडीचे दर 5 ते 10 रुपये किलोपर्यंत कोसळल्यामुळे पोल्ट्री व्यवसाय कोलमडून पडण्याच्या स्थितीत पोहोचला आहे. हिंगोली, औंढा नागनाथ सारख्या भागातून शेतकऱ्यांवर कोबडी पिल्ले पुरून टाकण्याची वेळ आल्याच्या बातम्या येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यावसायिक यामुळे खचून गेले आहेत.
सरकारने चिकन किंवा अंडी खाल्ल्याने करोना होतो ही अफवा असल्याचे शासकीय स्तरावरून स्पष्ट करण्यासाठी व्यापक मोहीम घ्यावी. अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करावी. सरकारने पोल्ट्री उद्योगाचे वीजबिल तातडीने माफ करावे. पोल्ट्रीसाठी संकटकाळात मोफत वीज पुरवावी. पोल्ट्रीधारकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, या संकटकाळातील कर्जाचे व्याज माफ करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.