मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे रविवारी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राज्यातलि सत्तास्थापनेचा तिढा त्या दिवशी सुटण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. दरम्यान, शिवसेनेला पाठींब्यावरून दलित आणि मुस्लीम मतांचे विभाजन होऊ नये यासाठी किमान समान कार्यक्रमात त्यांना झुकते माप देण्यासाठी कॉंग्रेस आग्रही असल्याचे समजते. पण शेतकऱ्यांच्या मुद्यावर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला सोबत घेता येईल असा शिवसेनेच्या नेत्यांचा होरा आहे.
दिलेल्या मुदतीत कोणताही पक्ष सरकार बहुमताचा दावा करू न शकल्याने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. त्यानुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतर कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यात बैठकांचा सिलसीला सुरू झाला. त्यातून हा तिढा सोडवण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने कंबर कसली आहे. आगामी दोन दिवसांत कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार भेट घेणार असून या भेटीत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे या पक्षाच्या सुत्रांनी सांगितले.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर किमान समान कार्यक्रमावर शिवसेनेला पाठिंबा देण्याचे सुतोवाच केले असल्यामुळे राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या घडामोडींना वेग आला आहे. दोन्ही कॉंग्रेसची किमान समान कार्यक्रम ठरविण्यासाठी काल बैठकही झाली. किमान समान कार्यक्रमाचा मसुदा ठरल्यानंतर त्या मसुद्यावर शिवसेनेसोबत चर्चा करून काही गोष्टींचा त्यात समावेश करण्यात येणार आहे. त्यानंतर सत्तेतील पदांच्या वाटपाचे सूत्र ठरवण्यात येणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीने अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मागितल्याच्या बातम्या काही दैनिकांत (प्रभात नव्हे) आल्या होत्या. त्याबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी खुलासा केला आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. या मुद्यावर अजित पवार आणि शरद पवार यांच्या विसंवाद असल्याचे चित्र पूर्णत: काल्पनिक असल्याचे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. राष्ट्रवादीला भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे ाहे. त्यामुळे पुन्हा सत्ता मिळवता येऊउ शकते, हा कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण होईल, अशी पक्षाची भूमिका आहे.