– जगदीश देशमुख
उन्हाळा आला की सोबत दुष्काळ घेऊन येतो. हे समीकरण मागील बऱ्याच वर्षांपासून जळून येत आहे. खासकरून महाराष्ट्रातील विशिष्ट भागात दरवर्षी दुष्काळाची छाया असते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात अजूनही यश आलेले नाही.
जगाच्या नकाशावर पृथ्वीचे क्षेत्रफळ स्थिर आहे. पण वाळवंटाचे आणि दुष्काळाचे क्षेत्र वर्षागणिक वाढतच चाललंय. वाळवंटाचे आणि दुष्काळाचे वाढत जाणारे हे क्षेत्र वेळीच रोखलं पाहिजे.
दुष्काळाची आकडेवारी पाहिली तर मानवजातीची वाळवंटीकरण आणि दुष्काळवाढीला विरोध करण्याची मानसिकता दिसत नाही असेच वाटते. जगातील एकेक वाळवंट, एखाद्या खंडापेक्षाही मोठे होऊ लागले आहेत. जगातील पहिल्या पाच वाळवंटाचे क्षेत्रफळ पाहिले तरी आपल्याला त्याची तीव्रता समजून येईल.
अंटार्क्टिका क्षेत्रफळ किलोमीटरमध्ये – 13,829,430 आर्टिक- 13,726,937, सहारा- 9,100,000, अरबी वाळवंट- 2,330,000, गोबी वाळवंट- 1,300,000, याशिवाय कलहारी, सीरियन, पांतागोनिया, भव्य व्हिक्टोरिया, हेही मोठमोठे वाळवंट आहेत. वाळवंटानी अल्जिरिया, चाड, इजिप्त, इरिट्रिया, लिबिया, माली, मॉरिटानिया, मोरोक्को, नायजर, सुदान, ट्युनिशिया, पश्चिम सहारा, इराक, जॉर्डन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, येमेन, चीन, मंगोलिया, अँगोला, बोत्स्वाना, नामिबिया, दक्षिण आफ्रिका, आर्जेन्टिना, चिली, ऑस्ट्रेलिया, सीरिया, अमेरिका आणि भारत हे देश व्यापून टाकले आहे.
दुष्काळामुळे जीवित व वित्त नुकसान याची महाराष्ट्राची आकडेवारी पाहिली तरी धक्का बसतो. 1972 सालच्या दुष्काळानंतर 1986, 1992, 2001 ते 2003 सालांदरम्यान दुष्काळ होता. राज्यात जून महिन्यात येणारा पाऊस 2008 व 2009 साली जुलै महिन्यात आला. पुढे 2010 ते 2012 सालीही तो उशिरा येत गेला. 2019 मध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू झाला. राज्यात साधारणपणे 1100-1150 मिलिमीटर पावसाची सरासरी असते.
राज्यात 380 नद्या, तर 407 मोठी व मध्यम धरणे आहेत. राज्यात पावसातून 164 अब्ज घनमीटर पाणी उपलब्ध होते. त्यातील प्रत्यक्षात 125 अब्ज घनमीटर पाणी वापरता येते. पर्जन्यछायेच्या प्रदेशात 47 शहरे येतात. पण पाण्याचे नियोजन नसल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होते. यावरून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे केवळ योजना आणून उपयोग नाही तर त्याची अमंलबजावणीही काटेकोरपणे होणे गरजेचे आहे.
वाळवंट आणि दुष्काळ या दोन्ही समस्यांचा एकमेकांशी कार्यकारण संबंध आहे. पाऊस कमी झाला की, दुष्काळ पडतो. जितका दुष्काळ पडत जाईल तितक्या जमिनी ओसाड राहतील आणि हळूहळू त्या जमिनींचे वाळवंटामध्ये रूपांतर होईल. या दोन्ही समस्यांचा उपाय एकच आहे. तो उपाय एकदम सोपा, मानवाच्या हातामध्ये आहे. तो म्हणजे, झाडे लावणे व जगवणे. झाडांची संख्या जास्तीत जास्त वाढवणे, जितकी झाडे जमिनीवर वाढतील तितकी जमिनीची धूप कमी होईल.
पाऊस अधिक पडेल परिणामी दुष्काळ आणि वाळवंटापासून आपली सुटका होईल. निसर्गाच्या चक्रामध्ये झाड हे केंद्रस्थानी आहे. झाडाच्या अवतीभवती मग बाकी प्राणी निसर्गातील इतर घटक, निसर्गचक्र फिरत असते. दुष्काळावर मात करण्यासाठी काटेकोरपणे उपाययोजना अंमलात आणल्या पाहिजे. वनविभागाच्या सामाजिक वनीकरणांची निसर्गासंदर्भात एखादी योजना असेल तर तिची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे. माझ्या विदर्भासाठी, माझ्या कोकणासाठी, माझ्या पश्चिम महाराष्ट्रासाठी यावरून राजकीय पुढाऱ्यांनी भांडत बसण्यापेक्षा योजना राबविण्यावर भर द्याचा.
आजही अनेक खेडेगावांतील घरांमध्ये गॅस कनेक्शन असूनही, जंगलातील लाकुडफाटा चुलीसाठी वापरतात. लाकुडफाटा मिळवण्यासाठी वृक्षतोड केली जाते. झाडांच्या संरक्षणासाठी कितीही कायदे करा, नियम करा, बंधने घाला, कृती कार्यक्रम आखा. जोपर्यंत प्रत्येकजण स्वत:च्या मनाशी ठरवून प्रामाणिकपणाने काम करत नाही तोपर्यंत काहीही शक्य होणार नाही.
आपण सगळेचजण झाडे लावण्याच्या बाबतीत उदासीन आहोत. वेळीच ही उदासीनता झटकायला पाहिजे. या समस्येमधून जगाला, मानवजातीला बाहेर काढण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न व्हायला पाहिजेत. प्रसंगी बंधने घातली तरी चालतील. सरकार, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन झटून कामाला लागले पाहिजेत. सामाजिक वनीकरण योजना विभागाच्यावतीने राबवण्यात येणारी झाडे लावा, झाडे जगवा, वनीकरण यासारख्या योजना परिणामकारकपणे राबवल्या पाहिजेत. लावलेली झाडे जगवली तरच पावसाचे प्रमाण नक्की वाढेल. त्यामुळे आकडेवारीत न अडकता लावलेली झाडे जगवली पाहिजेत.