रवींद्र कदम
बाधित पिके शेतात ठेवण्याचा अजब फतवा : नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची शेतकऱ्यांवर वेळ
नगर – परतीच्या पावसाने बाधित झालेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, शेतात पिके असतील तर त्याचे पंचनामे केले जातील आता फतवा अधिकाऱ्यांनी काढला आहे. त्यामुळे शेताबाहेर काढलेली बाधित पिकांची नुकसान भरपाई देणार कोण? असा प्रश्न शेतकऱ्यांन पुढे उभा ठाकला आहे. त्यामुळे पावसाच्या आस्मानीनंतर अधिकाऱ्यांची सुलतांनी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढावली आहे.
शासनाकडून मोठा गाजावाजा करत पिक विमा योजना लागू करण्यात आली. तसेच बाधित पिकांची नुकसान भरपाई देण्यात येइल असे सांगण्यात आले. मात्र, जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेला का कास प्रश्न आता उपस्थित होत आहे.
गेल्या दहा-पंधरा दिवसापासून पडलेल्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या हातातून हिरावला गेला आहे. मात्र, अधिकारी, लोकप्रतिनिधीकडून शेतकऱ्यांच्या बांदावर जाऊन केवळ पाहणी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नसल्याने नुसती पाहणी नको तर प्रत्यक्षात भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यामधून होत आहे.
सततच्या झालेल्या पावसामुळे खरिपांची पिके नेस्तनाबूत झाले असून, उभ्या व सोंगूण पडलेल्या बाजरी, सोयाबीन, मका, कपाशी पिकाला कोंब फुटलेल्या पिकांचे प्रशासनाकडूनच पंचनामे करण्यात येत आहे. त्यामुळे शेतातून बाहेर टाकेलेल्या बाधित पिकांचे करायचे तरी काय व झालेले नुकसान कुठुन भरायचे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक विम्यापासून व नुकसान भरपाई पासून वंचित राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढावली आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी ही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये नाराजीचा सूर उमठत आहे.
चार-पाच वर्षांच्या दुष्काळाची झीज यंदा नक्कीच भरून काढणार या आशेने शेतकऱ्यांनी पिकांवरील खर्चाला मोकळीक दिली होती. परंतु पिके काढणीच्या वेळी हाच जास्तीचा पाऊस पिकांसाठी घातक ठरला. बाजरी, मका, सोयाबीन काढणीच्या वेळी हा पाऊस थांबलाच नाही. हाताशी आलेले पीक भिजल्याने मातीमोल झाले.
एकही शेतकरी भरपाई पासून वंचित राहणार नाही : जिल्हाधिकारी
परतीच्या पावसाने जिल्ह्यात शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासाठी शासनाकडून बाधित पिकांचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, कृषीअधिकारी, व ग्रामसेवक यांची स्थानिक पातळीवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी शेतकऱ्यांचे बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करावे. नुकसान झालेला शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही. याची दखल घ्यावी.
राहुल द्विवेदी जिल्हाधिकारी, अहमदनगर
शेतकरी पडले पेचात
सततच्या पावसाने खरीप पिके गेलीच असून, शेतही गवताने पंधाडली आहेत. पावसाने गेल्या दोन तीन दिवसांपासून उघडीप दिल्याने शेत मशागत करावी की नाही असा पेच शेतकऱ्यांना पडला आहे. कारण मशागत केली तर अधिकारी पंचनामे करत नाही. त्यांना बाधित पिके शेतात लागतात. त्यामुळे शेताकडे पाहिले तरी डोके दुखते. तर रब्बी हंगामालाही उशीर होत आहे. त्यामुळे शेतकरीही दुहेरी संकटात पडला आहे.
अर्जून शिंदे ,शेतकरी, अरणगाव