तेजपुर – भारतीय हवाईदलाचे एक सुखोई-30 लढाऊ विमान गुरुवारी रात्री आसाममधील तेजपूर जवळ कोसळले. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल हर्षवर्धन पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानाचे दोन्ही वैमानिक वेळीच बाहेर पडल्याने सुरक्षित आहेत. यावेळी एका वैमानिकाच्या पायाला दुखापत झाली आहे. दुर्घटनेचे कारण समजण्यासाठी ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश देण्यात आले आहेत.
या विषयी बोलताना पांडे म्हणाले की, सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमान नियमित प्रशिक्षणावर होते. हा अपघात रात्री सुमारे 8.30 च्या सुमारास झाला. यानंतर हे विमान मिलनपूर परिसरात एका शेतात कोसळले. त्यानंतर तिथे आग लागली. या अपघातात सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झालेले नाही. स्थानिक लोकांनी दोन्ही वैमानिकांना तेजपूर येथील लष्कराच्या रुग्णालयात नेले. अग्निशामक विभागाचे बंब घटनास्थळी त्वरीत रवाना झाले.