शंकर दुपारगुडे
कोपरगाव – माणसाच्या जीवनात दिवसेंदिवस बदल होत आहेत. राहणीमानात बदल झाल्याने जीवनमान उंचावत असले, तरी अंतरमनाची उंची खालावली आहे. ताणतणावात जीवन जगणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आशा-अपेक्षांच्या ओझामध्ये अनेकांची दमछाक होते. मानसिक घुसमट होत असल्याने निराश जीवन जगण्याची वेळ अनेकांवर येत आहे. त्यामुळे विविध कारणांनी कोपरगाव तालुक्यात जीवनाला कंटाळून आत्महत्या तसेच अपघाताने सन 2019 या वर्षात तब्बल 119 लोकांचा मृत्यू झाला आहे.
केवळ अकरा महिन्यांत या घटना घडल्या आहेत. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये 13 वर्षांपासून 55 वर्षे वयाच्या व्यक्तींचा सामावेश आहे. मृत्यू झालेल्या 119 पैकी 22 लोकांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. त्यात 11 पुरुषांचा समावेश आहे. पाण्यात बुडून 10 जणांचा मृत्यू झाला असून, त्यात 6 पुरुष आहेत. विषप्राशन, जळीत, रेल्वेखाली अपघात इतर अपघात या कारणाने तालुक्यातील 119 जणांचा अंत झाला असला, तरी आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
तालुक्यात एकाच दिवशी तिघांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती. तालुक्यात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. यावर प्रत्येकाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. छोट्या-छोट्या कारणाने वादविवाद करून मनस्ताप करून घेणे योग्य नाही. एकमेकांना समजून घेऊन चर्चेतून मार्ग शोधला पाहिजे.
सध्या माणसांमध्ये सहनशील राहिली नाही. चुकीच्या पध्दतीने मोबाईलच्या अतिवापराचा परिणाम माणसाच्या जीवनावर होत आहे. समज -गैरसमज होण्याचे प्रकार मोबाईलमुळे वाढत आहेत. मोबाईल जितका चांगला, तितकाच वाईट म्हणण्याची वेळ आज आली आहे. अंगमेहनतीची कामे कमी झाली आहेत. शरीरात स्थूलपणा वाढत आहे. शरीराला दररोज अपेक्षित व्यायाम नाही. योगासन, प्राणायाम, आत्मचिंतन आत्मपरीक्षण, आध्यात्म या गोष्टीपासून माणूस दुरावत चालला आहे.
स्वतःला झालेले दुःख इतरांपुढे व्यक्त न केल्याने ते मनात दाटून राहते. संवादा अभावी ते हलके होते नाही. मोबाईलच्या दुनियेमध्ये माणसांमध्ये संवाद होत नाही. जवळ असूनही माणसे माणसाशी बोलत नाहीत. माणसा माणसांमधील संवाद कमी होत चालला आहे. वाढलेल्या ताणतणावातून योग्यवेळी मार्ग न निघाल्याने काहींनी आत्महत्या करण्याचा मार्ग स्वीकारला. आत्महत्या करून जीवन संपवणे चुकीचे आहे. प्रत्येकाने संवाद वाढविला पाहिजे. संवादातून मार्ग निघतो, असा सल्ला वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
आत्महत्या करणे हा आपल्या दु:खाचा अंतिम मार्ग नाही. परमेश्वराने आपल्याला मनुष्य जन्म दिला आहे. तो काही आत्महत्या करण्यासाठी नाही, तर स्वतः आनंदी जगा आणि इतरांनाही आनंदात जगवा. जीवनाचा उत्तम मार्ग बघा आणि इतरांनाही सांगा. जगा आणि जगू द्या, याप्रमाणे उत्तम प्रकारे जगण्यासाठी फॅशनच्या दुनियेत स्वत:ला आवरणे गरजेचे आहे.