औरंगाबाद – विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी परिसरात घडली. ऋतुजा गणेश शिंदे (वय 18) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ऋतुजाला बारावीला चांगले गुण मिळाले होते. ती नीट (NEET) परीक्षेचा अभ्यास करत होती. तिने याआधीही एकवेळा नीट परीक्षा दिली होती मात्र त्यात तिला यश आले नव्हते. त्यानंतर तिने पुन्हा अभ्यास सुरु केला होता. मात्र यावेळी परीक्षेच्या एक दिवस आधी तिने टोकाचे पाऊल उचलले. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास गळफास लावून तिने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र, अभ्यासाच्या तणावातून तिने आत्महत्या केली असावी, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
ऋतुजा अभ्यासात प्रचंड हुशार होती. तसेच तिचा स्वभावही मनमिळावू होता. तिने असे अचानक टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.