नवी दिल्ली – राजधानी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या एका शेतकऱ्याचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. गुरप्रीत सिंग असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तो पंजाबच्या फतेहगढ साहिबच्या अमरोह तहसीलमधील रुरकी गावचा रहिवासी होता.
गुरप्रीत सिंह बीकेयू सिद्धपूरशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. ही हत्या की आत्महत्या हे अद्याप समजू शकलेले नाही. कुंडली पोलीस ठाणे दोन्ही बाजूंनी तपास करत आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सागितले.
सोनीपत येथील कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उप अधीक्षक वीरेंद्र सिंग म्हणाले, प्राथमिक माहितीनुसार ही आत्महत्या असल्याचे दिसते. चौकशी सुरू करण्यात आली आहे. बीकेयू एकता सिद्धुपूरच्या गुरजिंदर सिंग यांनी सांगितले की, त्यांना सकाळी सहाच्या सुमारास घटनेची माहिती मिळाली आणि त्यांनी गुरप्रीत सिंगला रुग्णालयात नेले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. सोमवारी गुरप्रीत सिंग गावाला भेट देऊन सिंघू सीमेवर परतला होता.
गेल्या दोन दिवसांत शेतकऱ्यांशी साधलेल्या संवादात गुरप्रीत सिंगने कृषी कायद्यांवरील अडथळ्यामुळे नाराज असल्याचा उल्लेख केला आणि एक वर्षाहून अधिक काळ शेतकरी आंदोलने करूनही सरकार त्यांच्या मागण्या ऐकून घेत नाही, असे म्हटले.
गुरप्रीत सिंगने मृत्यूपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहिलेली नाही. त्याच्या डाव्या हातावर फक्त जिम्मेदार’ हा शब्द लिहिलेला आहे, असे सिंग यांनी यांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, गुरप्रीत सिंगच्या पश्चात त्याची पत्नी आणि एक 20 वर्षांचा मुलगा आहे.