नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनानिमित्त आपण करणार असलेल्या भाषणात कोणकोणते मुद्दे असावेत यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेकडून सूचना मागितल्या आहेत. लोकांनी आपल्या मनात असलेल्या संकल्पना, विचार ‘नमो ऍप’मधील ओपन फोरमवर कळवावेत असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त दरवर्षी पंतप्रधान दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून जनतेला उद्देशून भाषण करतात. त्या प्रथेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिनाच्या यंदाच्या वर्षीच्या भाषणात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोदी यांनी शुक्रवारी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, लोकांच्या मनात असलेले विचार, संकल्पना देशातील 130 कोटी जनतेसमोर जावेत असे वाटत आहे. मोदी यांच्या या ट्विटला 5 हजार लोकांनी लाइक तर एक हजार जणांनी रिट्विट केले आहे.