इंदापूरसह दौंड आणि बारामतीत क्षेत्र घटल्याचा परिणाम
भवानीनगर – उसाच्या उत्पादनासह सरासरी उताऱ्यात आघाडीवर असणारा आणि साखर पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात यंदा साखर उद्योगातील हे राजेपण टिकविण्याचे मोठे आव्हान कारखान्यांच्या संचालक मंडळांपुढे असणार आहे. महापुरामुळे नदीकाठंच्या उसक्षेत्राला बसलेला फटका तसेच तालुक्यात उसाचे घटलेले प्रमाण, शेतकऱ्यांनी चाऱ्यासाठी तोडलेला ऊस यामुळे गळित हंगाम सुरू होत असतानाच उसाची टंचाई भासणार आहे. यामुळे गाळपाची सरासरी गाठण्यासाठी इंदापूरसह बारामती, आणि दौंड या साखर पंढरीतील कारखान्यांना झगडावे लागण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 30 ते 35 लाख टन गाळप कमी होईल, असा अंदाज सध्याच्या स्थितीवरून वर्तविला जात आहे. शिवारात ऊस उभा दिसत असला तरी पावसामुळे बहुतांशी पीक हातचे गेले आहे. काही ठिकाणचा ऊस गळिता योग्य राहिलेला नसल्याने तोडीकरीता शेतकऱ्यांची मानसिकताच राहिलेली नाही. पिकांच्या पंचनाम्यात ऊसाचा समावेश आहे की नाही, याबाबत कृषि अधिकाऱ्यांकडून योग्य ती माहिती मिळत नसल्यानेही ऊस उत्पादक शेतकरी उसतोडीला काणकुण करणार आहे. कारण, किती नुकसान झाले किती पीक चांगले याचा पंचनामा झाल्यानंतरच भरपाई मिळणार आहे.
त्यातच पावसामुळे नवी ऊस लागवडीही झाली नसल्याने त्याचा विपरीत क्षेत्र घटण्यावर झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यात ऊस क्षेत्रात घट झाली आहे, याचा फटका कारखान्यांना बसणार आहे.
साखर पंढरी म्हणून ओळख असलेल्या बारामती, दौंड आणि इंदापुरातील साखर कारखान्यांना गेटकेन ऊस घेतल्याशिवाय त्यांचा गळित हंगामच पूर्ण होऊ शकत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी थोड्यफार फरकाने अशी स्थिती असते. परंतु, यंदा याचे प्रमाण अधिक असणार आहे. यामुळेच यंदा उसासाठी स्पर्धा होणार हे गृहीत धरून कारखान्यांनी दर जाहीर करण्याकरिता अद्यापही हात आखडता घेतला आहे. गळीत हंगाम लांबलेला त्यातच उसाची कमतरता यामुळे हंगाम लवकर सुरू करण्याची तयारी कारखान्यांकडून केली जात आहे.
साखर पंढरीत खासगी साखर कारखानेही आहेत. हे कारखाने केव्हाही चांगला दर जाहीर करून गळित हंगाम सुरू करू शकतात. ही दुसरी भीतीही सहकारी कारखान्यांना सतावत आहे. गळीत हंगाम सुरू होत असल्याने साखर आयुक्तांनी वेळापत्रकाप्रमाणे काऊंटडाऊन सुरू केले आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील उसाबरोबरच गेटकेन उसाबाबतही स्पर्धा तीव्र होणार हे निश्चित आहे. कारखान्यांपुढेही अशा प्रकारे ऊस मिळवण्याशिवाय पर्याय नाही. यातूनच आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस गेटकेन म्हणून कोणी पळवू नये, याकरिताही कारखान्यांच्या ऊस विकास विभागाने प्रतिस्पर्धी काखान्यांच्या हालचालींवर “वॉच’ ठेवला आहे.
ऊसासाठी वाट्टेल ते…
राज्यात गाळप हंगाम शुक्रवारी (दि.22) सुरू झाला आहे. 161 कारखान्यांनी गळित हंगामासाठीचे परवाने मागितले असताना त्यातील 105 साखर कारखान्यांना परवाने देण्यात आले आहेत. ज्या कारखान्यांनी अद्याप एफआरपीची रक्कम दिलेली नाही,अशा कारखान्यांना परवाने देण्यात आलेले नाहीत. दिवाळीखोरीतील कारखाने ज्यांनी घेतले आहेत, त्यांनीही गळितासाठी नव्याने परवाने मागितले आहेत. परंतु, याबाबत साखर आयुक्तांनी निर्णय घेतलेला नाही. गळित हंगाम करणाऱ्या कारखान्यांची संख्या वाढील तर उसासाठी वाट्टेल ते.., अशा भूमिकेतून या कारखान्यांकडून गेटकेन उसावरच अधिक भर दिला जाणार आहे.