भवानीनगर- इंदापूर आणि बारामती तालुक्यात अतिशय कमी प्रमाणात पाऊस पडला असल्याने दोन्ही तालुक्यातील साखर कारखान्यांना येत्या गळीत हंगामात ऊस गाळपासाठी कमी पडण्याची भीती निर्माण झाली आहे. हे कारखाने किती दिवस चालतील, याची चिंता कारखाना प्रशासनाला आहे. पावसाळा सुरू होऊन संपत चालला असला तरी केवळ एक ते दोन पावसावरच दोन्ही तालुक्याला समाधान मानावे लागले आहे.
पाऊस अत्यल्प पडल्याने शेतकऱ्यांच्या शेतात उभा ऊस होता. तो शेतकऱ्यांनी चाऱ्यासाठी वापरला आहे. थोड्या प्रमाणात काही शेतकऱ्यांनी चारा छावणी याठिकाणी ऊस दिला आहे. सध्या ऊस उभा आहे. त्या उसास पाणी मिळणे कठीण झाल्याने यंदाच्या हंगामात बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखाना, माळेगाव कारखाना व इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती कारखाना, इंदापूर कारखाना, कर्मयोगी कारखाना, तसेच खासगी साखर कारखान्यांना गाळपासाठी उसाची कमतरता निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे.