तालुक्यातील साखर कारखान्यांपुढे गाळीत हंगामाचे आव्हान
गोकुळ टांकसाळे
भवानीनगर – भीमा अणि नीरानदीला आलेला पूर आणि त्यामध्ये नीदकाठच्या उसक्षेत्राला बसलेला फटका त्यातच दुष्काळीस्थितीत जनावरांना चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊसतोड झाल्याने दि. 1 नोव्हेंबर 2019ला सुरू होणाऱ्या गळीत हंगामावर याचा परिणाम होण्याची शक्यता साखर उद्योगाकडून वर्तविली जात आहे. यामुळे यंदाचा गळीत हंगाम सर्वच साखर कारखान्यांच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरणार आहे.
इंदापूर तालुक्यातील भीमा आणि नीरा नदीकाठावर मोठ्या प्रमाणात उसक्षेत्र आहे. यासह नदीकाठ परिसरात उसाचे क्षेत्र आहे. परंतु, मे, जून मध्ये दुष्काळजन्य स्थितीत पशुधन जगविण्याकरीता स्वतःच्या उभ्या उसाच्या पिकाला कोयता लावून जनावरांना चारा म्हणून शेतकऱ्यांनी उसपिकाचा वापर केला आहे. यंदा दुष्काळाची दाहकता मे महिन्यांत अधिक जाणवत होती, त्यातच जनावरांना लागणाऱ्या हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्याने याकरीता उसाचा वापर चाऱ्याकरीता केला गेला आहे. त्यानंतर या महिन्यांत उद्भवलेल्या पुराच्या तडाख्यातही तालुक्यातील बहुतांशी उसक्षेत्र सापडले आहे.
विशेषत: भीमा आणि नीरा नदीकाठावरील उसक्षेत्राला पूराचा मोठा फटका बसला आहे. यात उसाचे फडांचे मोठे नुकसान झाले आहे, यात गाळपाला आलेल्या उसाचे प्रमाण मोठे आहे. (इंदापूर तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे अद्याप झाले नसल्याचे याची नेमकी आकडेवारी प्रशासनाकडेही उपलब्ध नाही) यातूनच साखर कारखान्यांची नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या गळीत हंगामासाठी ऊस मिळवण्यात मोठी स्पर्धा होणार आहे, अशा स्थितीत जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी नेण्याकरीता साखर कारखान्यांमध्ये चढाओढ लागणार आहे.
इंदापूर तालुक्यात गेली चार ते पाच वर्षे पावसाचे प्रमाण कमीच राहिलेले आहे. नदीच्या पाण्यावर तसेच कालव्यांच्या आवर्तनावर काही ठिकाणी ऊसाची लागवड केली जाते. परंतु, यंदा दुष्काळजन्य स्थितीमुळे तसेच कालव्यांचे आवर्तनेही कमी करण्यात आल्याने चालू वर्षी ऊस लागवडीच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे कारखान्यांकडून सांगितले जात आहे.
यातून नोव्हेंबरमधील गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सहकारात सांघिक प्रयत्न करावे लागणार आहेत. अन्यथा उसाची पळवा-पळवी होण्याचे प्रकार घडण्याचीच दाट शक्यता आहे. निसर्गाच्या अनिश्चितीमुळे शेतकरीवर्ग अडचणीत सापडला असून, येणाऱ्या संकटांना कसे सामोरे जायचे, या चिंतेत ऊस उत्पादक शेतकरी आहेत.
- चाऱ्यासाठी उसतोड…
इंदापूर तालुक्यातील नद्यांना पूर आला असला तरी तालुक्यातील तलाव अद्याप कोरडेच आहेत. कालव्यांची आवर्तने बंद आहेत. यातून चारा लागवडही कमी झाल्याने अशा दुष्काळजन्य स्थितीत जनावरांकरीता हिरवा चारा म्हणून आजही उसाशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. जनावरे जगवण्यासाठी शेतकरी उसतोडून तोच चारा जनावरांना देत आहेत. यातून जनावरांच्या चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊसतोड होत आहे. यामुळे शेतामध्ये गाळपासाठी उपलब्ध असणाऱ्या ऊसपिकात घट होणार हे नक्की मानले जात आहे.