साखरेऐवजी इथेनॉलचे उत्पादन : दरात फार वाढ होणार नाही
पुणे – यावर्षी देशात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असला तरी मुळातच उसाच्या लागवडीखालील क्षेत्र कमी होणार आहे. त्याचबरोबर साखरेऐवजी इथेनॉल तयार करण्यास बरीच चालना मिळत असल्यामुळे यावर्षी साखरेचे उत्पादन केवळ 26 दशलक्ष टन होण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर हा तीन वर्षांतील निचांक ठरणार आहे.
गेल्यावर्षी साखर उत्पादनासाठी परिस्थिती चांगली होती. त्यामुळे 33.16 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन झाले होते. त्यात यावर्षी 21.5 टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे. ऊस कमी असल्यामुळे साधारणपणे आक्टोबरपासून सुरू होणारे साखरेचे उत्पादन अनेक राज्यांत आणखी सुरू झालेले नाही. या आठवड्यापासून काही राज्यांतील उत्पादन सुरू होणार आहे. उत्पादन सुरू झाल्यानंतर याबाबत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता साखर कारखानदारांची संघटना असलेल्या “इस्मा’ या संस्थेने म्हटले आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील उसाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर निर्माण करणाऱ्या दोन मोठ्या राज्यातील साखर उत्पादन कमी होणार आहे. 4 महिन्यांपूर्वी उसाची परिस्थिती ठीक होती. मात्र, दरम्यानच्या काळात काही ठिकाणी पाऊस नाही तर, काही ठिकाणी गरजेपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे उसाच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. मात्र, असे असले तरी पुढील एक वर्षात तरी देशातील साखरेच्या किंमती स्थिर राहण्याची शक्यता आहे. कारण या अगोदर 3 वर्षांपासून साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असून त्याचा बराच साठा भारताकडे उपलब्ध आहे.