लॉकडाऊनचा फटका; देशांतर्गत तसेच जागतिक बाजारातून उठाव नाही
पुणे – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा साखर उद्योगाला मोठा फटका बसला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 64 लाख टनांनी साखर उत्पादन घटले आहे. देशांतर्गत उत्पादनातील ही आकडेवारी 20 टक्क्यांनी घटली असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स् असोसिएशनच्या (इस्मा) वतीने देण्यात आली आहे.
लॉकडाऊनचा सर्व जगाला फटका बसला आहे. भारतात उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये साखरेचे मोठे उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षी गळीत हंगामात 15 एप्रिल अखेर देशभरात 172 साखर कारखाने सुरु होते. यंदा या कालावधीपर्यंत 139 सुरू आहेत. तर, 15 एप्रिलपर्यंत साखरेचे 247 लाख टन उत्पादन झाले आहे.
गेल्या हंगामात 311 लाख टन साखर उत्पादित झाली होती. लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील साखर कारखाने जवळपास बंद झाले आहेत; तर, उर्वरित कारखान्यांचा हंगाम आठवडा भरात संपणार आहे. राज्यातील 146 पैकी 136 साखर कारखान्यांनी हंगाम पूर्ण केला आहे, त्यामुळे साखरेचे अधिक उत्पादन होऊ शकणार नसल्याची परिस्थिती आहे.
लॉकडाऊन 14 एप्रिलला संपेल, या हेतूने अनेक कारखान्यांनी साखर आंतरराष्ट्रीय बाजारात पाठविण्याचे नियोजन केले होते. मात्र, लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविल्याने, तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद असल्याने साखरेला मागणी नाही. याशिवाय देशांतर्गत बाजारपेठा देखील करोनाच्या सावटाखाली असल्याने साखरेला अपेक्षित उठाव मिळत नसल्याची परिस्थिती आहे. तर, अडकलेल्या ऊसतोड मजुरांची खाण्या पिण्याची व आरोग्य सेवेची व्यवस्था देखील साखर कारखान्यांनाच करावी लागत असल्याने अतिरिक्त आर्थिक पडत आहे.