कामगारांचा प्रलंबीत वेतन वाढीचा प्रश्न सोडविण्याची मागणी
नगर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ या दोन राज्यव्यापी संघटनांची नुकतीच सांगली येथे बैठक पार पडली. या बैठकित 30 नोव्हेंबर पासून राज्यातील साखर व जोड धंद्यातील कामगारांचा संप पुकारण्यात आला असल्याची, माहिती महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघांचे सहचिटणीस कॉ. आनंदराव वायकर यांनी दिली.
यावेळी प्रतिनिधी मंडळांचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, शंकरराव भोसले, राऊ पाटील, अविनाश आपटे उपस्थित होते. साखर कामगारांच्या वेतन वाढीच्या करारांची मुदत 31 मार्च 2019 ला संपली आहे.
फेब्रुवारी 2019 ला दोन्ही संघटनांनी महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री, सहकार मंत्री, कामगारमंत्री, साखर संघ अध्यक्ष, साखर आयुक्त, कामगार आयुक्त यांना नोटीसा देऊन नंतर नविन मागण्यांचे निवेदन दिले.
करारांची मुदत संपून देखील 18 महिने पूर्ण होऊनही अद्याप साखर व जोड धंद्यातील कामगाराच्या वेतन वाढीबाबत शासनाने वेतन वाढीच्या प्रश्नांची सोडवणुक केलेली नाही. तर वेतन वाढीसाठी त्रिपक्ष समिती नेमली नाही. साखर कारखान्यातील व जोड धंद्यातील कामगार 30 नोव्हेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.