आतापर्यंत 35 लाख टनांचे निर्यात करार : निर्यातीसाठी दोन महिने संधी
पुणे – गेली दोन-तीन महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या साखरेच्या दरवाढीमुळे देशातील साखर कारखान्यांनी साखर निर्यातीला प्राधान्य दिले आहे. हा वेग पहाता यंदा उद्दिष्टाच्या 80 टक्के साखर निर्यात होऊ शकेल, असा अंदाज साखर उद्योगातील तज्ज्ञांनी वर्तविला आहे. याचा सकारात्मक परिणाम साठा आणि शिल्लक साखरेचा साठा कमी होण्यावर होणार आहे. अजूनही कारखान्यांना एप्रिलपर्यंत साखर निर्यात करता येऊ शकत असल्याने मार्च आणि एप्रिल हे दोन महिने साखर कारखान्यांना साखर निर्यातीसाठी सुवर्णसंधी आणणारे ठरणार आहेत.
केंद्राने देशातील विविध भागांतील 530 साखर कारखान्यांना यंदा 60 लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्ट दिले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचा तुटवडा असल्याने याचा फायदा कारखान्यांनी घ्यावा यासाठी केंद्रानेही द्रुतगतीने पावले उचलत लवचिकपणे बदल केले. काही दिवसांपूर्वी ज्या कारखान्यांनी साखर निर्यात केली नाही. त्या कारखान्यांचा कोटा इतर साखर कारखान्यांना देऊन साखर निर्यात केलेल्या कारखान्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले. 6 लाख टनांचा अतिरिक्त कोटा या कारखान्यांना दिला. याचा सर्वाधिक फायदा उत्तर प्रदेशला होणार आहे. उत्तर प्रदेशातील कारखान्यांनी कोट्याइतकी साखर निर्यात केली आहे. महाराष्ट्रातील ज्या साखर कारखान्यांनी निर्यात केली आहे. त्या कारखान्यांनाही या वाढीव कोट्याचा फायदा होवू शकेल.
कोटा वाढवून देण्याच्या निर्णयामुळे सकारात्मक परिणाम होऊन अनेक कारखाने नव्याने करार करण्याच्या तयारीत आहेत. केंद्राने रखडलेले अनुदान तातडीने दिल्यास कारखाने निर्यातीसाठी आणखी जोर लावतील असा अंदाज साखर उद्योगाचा आहे. आतापर्यंत देशातील साखर कारखान्यांनी 35 लाख टन साखरेचे निर्यात करार विविध देशांबरोबर केले आहे. त्यापैकी 23 लाख टन साखरेची निर्यात झाली आहे. उर्वरित साखर निर्यातीच्या मार्गावर आहे.
करोनामुळे दरात घसरण
आंतरराष्ट्रीय पातळीवर करोना व्हायरसमुळे सर्वच व्यापाऱ्यांना फटका बसला आहे. सध्या व्यापारापेक्षा मानवी हानी रोखण्याकडे बहुतांशी देशांचे लक्ष लागले आहे. यामुळे आयात निर्यातीकडे अनेक देशांचे काहीसे दुर्लक्ष होत असल्याची माहिती साखर उद्योगाच्या सूत्रांनी दिली. पंधरवड्यापूर्वी ज्या चढ्या दरामध्ये साखर विकली जात होती, तितका दर सध्या मिळत नसल्याची स्थिती आहे. रोगाची साथ नियंत्रित येण्याची शक्यता निर्माण झाल्यास दर पुन्हा वाढतील, असा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांचा आहे.