सरकारमधील काही लोक बाहेर पडतील आणि सरकार पडेल, असे भाकीत भाजपचे ज्येष्ठ नेेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा केले. ते म्हणाले, संधी नसतानाही जबरदस्ती, बेइमानी करून हे सरकार महाराष्ट्रात राज्य करत आहे. सरकार कसे पडेल हे आताच सांगितले तर ते सावध होतील. त्यामुळे त्यांना सावध कशाला करू? या सरकारमधलेच काही लोक बाहेर पडतील आणि सरकार पडेल, असे मुनगंटीवारांनी सांगितले.
राज्याचे माजी वन व महसूलमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात सत्ताबदलाचे सूचक वक्तव्य केले. या पार्श्वभूमीवर फडणवीस व पाटील यांनी तातडीने नागपुरात सरसंघचालकांची भेट घेतली. फडणवीस व पाटील यांची भागवत भेट तसेच सरकार पडण्याचे वक्तव्य याचा काही संबंध आहे का, असे विचारले असता संघ व भाजप एकमेकांना विचारून राजकारण करीत नाही. सरकार व संघाचा संबंध नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.
राज्य विधिमंडळाचे मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्याबरोबर लगेच दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी नागपुरात संघ मुख्यालयी सरसंघचालकांची भेट घेतल्याने विविध चर्चांना उधाण आले. फडणवीस व पाटील विशेष विमानाने विमानतळावर आले आणि तिथूनच ते थेट संघ मुख्यालयात गेले. तिथे बंदद्वार चर्चेनंतर परत विमानतळावर येऊन मुंबईला रवाना झाले.