मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानानंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या एका वक्तव्याने राज्यात रान उठले आहे. विरोधकांकडून भाजप आणि राज्यपाल आणि सुधांशु त्रिवेदी यांच्यावर सडकून टीका करण्यात येत आहे. यातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीदेखील सुधांशु त्रिवेदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सुधांशु त्रिवेदी यांनी,’औरंगजेबला पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांनी 5 वेळा माफी मागितली’, असे वादग्रस्त वक्तव्य केले. याच वक्तव्याचा समाचार घेत जितेंद्र आव्हाड म्हणाले, शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जातोय, यामध्ये मोठे षडयंत्र आहे. याच बदलातून आणि वर्णभेदातून हर हर महादेव नवीन चित्रपट आणला होता. या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे कसे श्रेष्ठ आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. गेले काही वर्षे शिवाजी महाराजांचे कर्तृत्व विशिष्ट पद्धतीने वेगळे दाखवले आहे. या घटनेला कोणता ऐतिहासिक संदर्भ नाही. इतिहासात अनेक माणसाने शूर कार्य केले आहे, त्यांना योग्य पद्धतीने दाखवावे.
तसेच पुढे बोलताना आव्हाड यांनी, सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांची पाच पत्रे दाखवावी. या लोकांनी सोयीप्रमाणे शिवाजी महाराजांना जेवढे दाखवता येईल तेवढे दाखवत आहेत. तर ‘हर हर महादेवा’चे निर्माते दर्शन सांगत आहे, त्यांच्याकडे पुरावा आहे. तर ते पुरावे घेऊन घेऊन बाजीप्रभू देशपांडे यांच्या कुटुंबीयांना दाखवावे. आपण या चित्रपटाला मराठीतून हद्दपार केला. परंतु अनेक भाषांमध्ये हा चित्रपट दाखवत आहेत. शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा दाखवत असेल तर कोणीतरी बोलायला पाहिजेच, त्यासाठी मी पुढे आलो. त्यासाठी माझ्यावरती खोटा केसेस केल्या आहेत.
राज्यपाल आणि सुधांशू हे आपला इतिहास बदलायला निघालेले आहे. मराठी माणसाने यावरती बोलले पाहिजे. आपल्याला ज्याने शिक्षण दिले. शिक्षणाची दार खुले करून दिले. त्या ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल काय बोलले हे सगळे महाराष्ट्राला माहिती आहे. आम्ही यांना असंच सोडून दिलं तर, आपले सर्व आदर्श कधी उधळतील हेच आपल्याला कळणार नाही.
यासंदर्भात काल राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही त्रिवेदी यांच्या विधानावर ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 वेळा औरंगजेबाची पत्र लिहून माफी मागितली होती, असा बोलणारा भाजप प्रवक्ता ठार वेडाच असू शकतो, असं आव्हाड म्हणालेत.