मुंबई – 23 नोव्हेंबर 2019 च्या सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणातलं सगळ्यात मोठं धक्कातंत्र संपूर्ण राज्याला पाहायला मिळालं. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र हे सरकार केवळ 72 तासात कोसळलं आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले.
मात्र, काहीदिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. “तो शपथविधी शरद पवारांसोबत चर्चा करुनच झाला होता’, असा खळबळजनक गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे. त्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मात्र या शपथविधीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. शरद पवार यांनी ‘पहाटेच्या शपथविधीमुळे एकच चांगली गोष्ट घडली ती म्हणजे राष्ट्रपती राजवट उठली’ असे म्हटले आहे. महाविकास आघाडी येण्याआधी पहाटेचा शपथविधी झाला होता. त्यामुळे चांगली गोष्ट एकच घडली की राष्ट्रपती राजवट उठली असे शरद पवार म्हणाले होते.
दरम्यान, आता शरद पवार यांच्या या व्यक्तव्यावर राज्याचे वन व पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, एवढा मोठा नेत्याने असे खोटं बोलणे शोभत नाही. यावेळी मुनगंटीवार म्हणाले, ‘जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. तेव्हा एक गोष्ट नक्कीच स्पष्ट झाली, अजितदादा आमच्यासोबत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट आश्वासन दादांनी दिले होते. तेव्हाही शरद पवारांनी आम्हाला आशीर्वाद दिल्याचे फडणवीस म्हणाले होते. अशा स्थितीत शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने खोटे बोलावे, हे आश्चर्यकारक आहे.” असं टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.
तसेच ते पुढे म्हणाले, “राष्ट्रपती राजवट हटवल्याने आम्ही अजितदादांची विश्वासार्हता कमी केली, असे म्हणणे योग्य नाही. हे अक्कल बिघडवणारे कृत्य आहे. राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी शपथ घ्यावीच लागेल, असे अनेक मोठे राजकारणी सांगत असतील तर .. हे पूर्णपणे खोटे आहे.’ असं देखील ते यावेळी म्हणाले.