-कल्याणी शंकर
जेव्हा पक्षामध्ये लोकांचा अपेक्षाभंग होतो, तेव्हा नवीन पक्षांचा जन्म होतो. आपल्याला पक्षात काहीही भविष्य नाही, ही कार्यकर्त्यांच्या मनात येणारी भावनाच अंतर्गत समस्या उद्भवण्यास कारणीभूत ठरते.
एके काळी शिस्तीसाठी आणि संघटनात्मक एकीसाठी प्रसिद्ध असलेल्या भाजपमध्ये अंतर्गत कलह वाढत चालला आहे. अन्य राजकीय पक्ष आपापल्या नेत्यांवर अशा प्रकारच्या संघर्षात गुंतण्याची वेळ आणत नाहीत असे नाही; परंतु हीच गोष्ट भाजपमध्ये घडल्यावर निश्चितपणे चर्चा होणारच.
आपल्या इतिहासातील सुवर्णकाळातून जात असलेल्या पक्षाला नेमके काय झाले आहे? इंदिरा गांधी यांच्या काळानंतरचे सर्वांत शक्तिशाली पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचे नेतृत्व उदयास आले आहे; परंतु करोना महामारीच्या दुसऱ्या साथीने त्यांची प्रतिमा धूसर करून टाकली. अर्थात, तरीही अद्याप ते लोकप्रिय नेते आहेत. लसीकरणाचे धोरण, रुग्णालयांत खाटांची कमतरता तसेच ऑक्सिजनची टंचाई यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोदींची जादू चालल्याचे दिसले नाही.
पहिली समस्या अशी की, काही राज्यांमध्ये भाजपने अनेक पक्षबदलू लोकांना सामील करून घेतले आहे. त्यामुळे भाजपमध्ये मूळ कार्यकर्त्यांत नाराजी आहे. आपण अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करीत असताना पक्षात काल-परवा दाखल झालेल्या लोकांना सन्मानाची वागणूक दिली जाते, अशी त्यांची भावना झाली आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक, आसाम आणि उत्तराखंडमध्ये काहीशी अशीच परिस्थिती आहे. उत्तर प्रदेश हे एक मोठे राज्य असल्यामुळे भाजपला तेथे आशा अधिक आहेत.
2017 मध्ये भाजपने या राज्यात मोठे यश संपादन केले होते. मतभेद व्यक्त करणाऱ्यांकडे अनेक मुद्दे आहेत. गुजरात कॅडरचे सेवानिवृत्त अधिकारी ए. के. शर्मा यांनी पंतप्रधान कार्यालयातही सेवा बजावली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांना उत्तर प्रदेशात विधान परिषद सदस्य बनविण्यात आले. त्यांना पक्षातही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे जुने-जाणते नेते शर्मा यांच्याकडे एक नवे आव्हान म्हणून पाहतात, कारण शर्मा यांना पंतप्रधानांचा पाठिंबा आहे. काही विरोधक तर मुख्यमंत्री बदलण्याचीही मागणी करीत आहेत. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नात्यांमध्ये कटुता आल्याचीही चर्चा आहे.
पश्चिम बंगालचा विचार करायचा झाल्यास पक्षबदलू नेते तृणमूल कॉंग्रेसमध्ये “घरवापसी’ करू लागले आहेत. मुकुल रॉय हे “घरवापसी’ करणारे बडे नेते आहेत. पूर्वी मुकुल रॉय हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय होते. भाजपच्या स्थानिक शाखेत अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे की, हे सर्व काही निवडणुकीची रणनीती म्हणून घडवून आणण्यात आले. कर्नाटकमध्येही सरकार अंतर्गत भांडणांनी ग्रस्त आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना बदलण्याची मागणीही होऊ लागली आहे.
त्रिपुरामध्ये विरोधक पुन्हा एकदा डोके वर काढू लागले आहेत. कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले काही आमदार मुख्यमंत्री बिप्लव कुमार देव यांना पदावरून दूर करण्याची मागणी करीत आहेत. राजस्थानात माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे राज्याच्या नव्या नेतृत्वाला मानण्यास नकार देत आहेत. त्या आपले स्वतंत्र कार्यक्रम जाहीर करीत आहेत. भाजपमध्ये स्थानिक पातळीवर सर्वकाही आलबेल नाही, असेच दाखवून देणाऱ्या या घटना आहेत. अर्थात, अद्याप परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली नाही.
कॉंग्रेससुद्धा सध्या अंतर्गत मतभेदांचा सामना करीत आहे. केंद्रीय नेतृत्व कमकुवत असल्यावर राज्यांमधील शाखांचा आवाज वाढणे स्वाभाविक आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये 23 नेत्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पक्षाची पुनर्बांधणी करण्याची मागणी करणारे पत्र लिहिले होते. या नेत्यांमध्ये गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा तसेच बी. एस. हुड्डा यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश होता. पंजाब तसेच राजस्थानसारख्या कॉंग्रेसशासित राज्यांमध्येही मुख्यमंत्र्यांना हटविण्याची मागणी होत आहे.
पंजाबात माजी क्रिकेटपटू आणि कॉंग्रेस नेते नवज्योतसिंह सिद्धू मुख्यमंत्री अमरिंदरसिंह यांच्यावर हल्ले चढवीत आहेत. हायकमांडने दोन्ही गटांना पक्षसंघटनेत तसेच सरकारमध्ये समायोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. “टीम राहुल’मधील खेळाडू एका पाठोपाठ एक बाद होत आहेत. ज्योतिरादित्य शिंदे आणि जितीन प्रसाद हे दोघेही राहुल गांधी यांचे निकटवर्तीय होते. या दोघांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कॉंग्रेस सोडावी की सोडू नये अशी द्विधा अवस्था असणाऱ्या नेत्यांमध्ये सचिन पायलट यांचाही समावेश आहे. मिलिंद देवरा यांचीही स्थिती अशीच आहे.
भाजप आणि कॉंग्रेसमध्ये अशी बेशिस्त आणि गटबाजी यापूर्वी दिसून आली नव्हती. दोन्ही पक्षांमधील बंडखोरीला वेसण घालण्यात कधी यश मिळेल हा मुख्य प्रश्न आहे. भाजप केंद्रात सत्तेत असल्यामुळे अडचणीतून बाहेर पडणे भाजपला तुलनेने अधिक सोपे आहे; परंतु केंद्रात विरोधी बाकांवर असलेल्या कॉंग्रेसला तो फायदा मिळणार नाही. दिल्लीतील सत्ता काबीज करण्याची कॉंग्रेसची स्वप्ने आज खूपच क्षीण झालेली आहेत. त्यामुळेच वेगवेगळे गट पक्ष सोडण्याच्या धमक्या वारंवार देत आहेत. त्यामुळे अंतर्गत कलह कॉंग्रेसच्या नेतृत्वाकडून कसे सोडविले जातात, हे पाहावे लागेल.