नांदेड : “माझ्या आई होण्याची गोष्ट” ही साहित्यकृती लेखिकेच्या चिवट जिद्दीचा यशस्वी संघर्ष असून मराठी साहित्यात या आत्मकथनाने मोलाची भर घातल्याचे प्रतिपादन पूर्व शिक्षण संचालक डॉ.गोविंद नांदेडे यांनी केले आहे. माझ्या आई होण्याची गोष्ट या डॉ अर्चना सावंत लिखित पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी अध्यक्षीय समारोप प्रसंगी ते बोलत होते.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झालेल्या या ग्रंथ प्रकाशन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक देविदास फुलारी आणि प्रसिद्ध साहित्यिक शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी उपस्थित होते.. प्रारंभी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने प्रारंभ झालेल्या या पुस्तक प्रकाशन समारंभाचे प्रास्ताविक पुस्तकाचे प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी केले.
अल्पावधीत पुस्तक प्रकाशनाचा एक अत्यंत चांगला अनुभव या ग्रंथ प्रकाशनाच्या माध्यमातून आपण घेतल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. साहित्यिक शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी आपल्या भाषणात लेखिकेच्या अनुभव कथनाच्या कल्पक शैलीचे कौतुक करून सदर पुस्तक तमाम भारतीय स्त्रियांच्या मनोव्यवस्थेचे अत्यंत कुशल प्रतिनिधित्व करीत असल्याचे सांगितले. माझ्या आई होण्याची गोष्ट या पुस्तकाचे प्रकाशन देविदास फुलारी आणि उपस्थित अतिथीच्या हस्ते करण्यात आले.
प्रसिद्ध साहित्यिक देविदास फुलारी यांनी लेखिकेच्या जीवनाला आई होण्याच्या मंत्रमुग्ध भावनेने उदात्त उंचीवर नेऊन बसवले असून प्रस्तुत पुस्तक म्हणजे डॉ.अर्चना सावंत यांच्या अस्सल अनुभूतीची परखड साक्ष असल्याचे प्रतिपादन केले आहे. पुस्तक वाचताना वाचक स्वत्व विसरून जातो असेही आपल्या भाषणात त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सहशिक्षक पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ अजय क्षीरसागर यांनी मानले.
कार्यक्रमास लेखिका डॉ.अर्चना सावंत यांचे पती सावंत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी राव कपाळे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त साहित्यिक शिवा कांबळे, यशदाचे संशोधन अधिकारी बबन जोगदंड, साहित्यिक विलास ढवळे, शहरातील प्रसिद्ध डॉक्टर डॉ. पुरुषोत्तम दाड, आकाशवाणीचे मिलिंद व्यवहारे, पतसंस्थेचे विवेक मोरे, लेखाधिकारी महाजन, लेखिकेचे आई सिंधू क्षीरसागर आणि वडील भाऊसाहेब क्षीरसागर यांच्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य साहित्यिक या कार्यक्रमास उपस्थित होते.