भारती हॉस्पिटल येथे उपचार घेणारी अंगणवाडी सेविका 14 दिवसांनी आयसीयूतून बाहेर
पुणे – परदेश दौरा किंवा परदेशांतून आलेल्या नातेवाईकाच्या संपर्कात त्या आल्या नाहीत. मात्र, करोनासारख्या जीवघेण्या संसर्गाने त्यांना ग्रासले. आयसीयूमध्ये उपचार सुरू केल्यानंतर हा आजार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. डॉक्टरांचे प्रयत्न, जगण्याची इच्छाशक्ती आणि शेकडो पुणेकरांच्या प्रार्थनेच्या बळावर या महिलेने करोनाचा पराभव केला आहे. तब्बल 14 दिवस आयसीयूमध्ये असलेली ही अंगणवाडी सेविका करोनाला हरवून वेगाने बरी होत असून, मंगळवारी या महिलेचा व्हेंटिलेटर काढण्यात आला आहे. अशा अवस्थेतून बरी होणारी संबंधित महिला देशातील पहिली रुग्ण ठरली आहे.
संबंधित अंगणवाडी सेविकेने 3 मार्च रोजी पुणे ते वाशी असा कॅबने प्रवास केला होता. 6 मार्चपासून या महिलेस करोनासदृश लक्षणे होती. मात्र, परदेश प्रवास तसेच परदेशी व्यक्तीच्या संपर्कात न आल्याने हा ताप व्हायरल असेल, असा समज करत या महिलेने सिंहगड रस्ता येथील एका रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर त्रास वाढल्याने या महिलेस 16 मार्च रोजी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने भारती हॉस्पिटल येथील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. या महिलेस स्वाइन फ्लू असण्याची शक्यता लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्यांचे घशातील स्रावाचे नमुने एनआयव्हीला पाठवले मात्र, हा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर पुन्हा 19 मार्चला स्रावाचे नमुने पाठवत करोनाची तपासणी करण्यात आली. यावेळी अहवाल पॉझिटिव्ह आली. या महिलेला संसर्ग कसा झाला, या विचारानेच भविष्यात करोना वेगाने पसरण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, भारती हॉस्पिटलने प्रभावीपणे उपचार करत या महिलेला जीवघेण्या आजारातून वाचवले आहे.
महापालिकेने उचलला खर्च
या महिलेवर अत्याधुनिक उपचार करण्यात येणार होते. मात्र, हा खर्च मोठा असल्याने तसेच या महिलेच्या कुटूंबाची आर्थिक स्थिती अडचणीची असल्याने हा सर्व खर्च महापालिका देणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही घोषणा केला होती. तर, भारती हॉस्पिटलनेही प्रयत्नांची
पराकाष्ठा केली.
या अंगणवाडी सेविका अत्यावस्थ स्थितीतच दाखल झाल्या होत्या. मात्र, त्यांना वाचवण्यासाठी आमच्या डॉक्टरांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. या महिलेला इतर आजार नव्हते. त्यांची जगण्याची इच्छाशक्ती, सर्वांच्या प्रार्थनेमुळे करोनातून त्या वेगाने बऱ्या होत आहेत. 14 दिवसानंतर त्यांचा व्हेंटिलेटर काढला असून, आज त्यांनी लिक्वीड डायटही घेतले. ही सर्वांसाठी खूप आनंदाची बाब आहे. पूर्ण बऱ्या झाल्यानंतरच त्यांना घरी सोडले जाणार आहे.
– डॉ. अस्मिता राजेंद्र जगताप, कार्यकारी संचालिका, भारती हॉस्पिटल