वाई – उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेने अत्यंत काटेकोर आणि सभासद हिताचा कारभार केल्यामुळे ही संस्था सहकारातील यशस्वी उदाहरण ठरली आहे. वाई शहराबाहेर विस्तारलेली ही संस्था जिल्ह्याच्या ठिकाणी सातारा येथे असणे आवश्यक आहे. त्यासाठीच लवकरच होणाऱ्या सातारा शाखेच्या उद्घाटनाचे निमंत्रण स्वीकारत असल्याचे सहकारमंत्री ना. सुभाषराव देशमुख यांनी सांगितले.
उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा कोल्हापुरे यांनी सहकारमंत्री ना. सुभाषराव देशमुख यांची भेट घेऊन संस्थेची माहिती सांगितली व साताऱ्या शाखेच्या उद्घानासाठी निमंत्रण दिले. त्यावेळी बोलताना सहकारमंत्री पुढे म्हणाले, अत्यंत चोख व पारदर्शक कारभार यामुळेच उत्कर्ष पतसंस्था सलग सात वर्षे 15% लाभांश देत आहे.
बॅंकिंग करतानाच विशेषत: बचत गटांच्या माध्यमातून हजारो महिलांना भक्कम आधार देण्यासाठी उत्कर्षने राबविलेली आणि यशस्वी केलेली चळवळ इतरांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. याशिवाय कला, क्रीडा चळवळींना पाठिंबा देत सभासद पाल्यांच्या पाठीवर टाकली जाणारी शाबासकीची थाप मोलाची ठरत आहे. काळाची गरज ओळखुन आधुनिकतेशी सांगड घालत संस्थेने डिजिटलायझेशन वर जास्तीतजास्त लक्ष केंद्रित करून सातारा जिल्ह्यातील पहिली कॅशलेस पतसंस्था होण्याचा मान मिळवला आहे.
अशा सर्व उपक्रमांमुळे सभासदाच्या विश्वास पात्र ठरत वेगाने प्रगतीचे विविध टप्पे पार करत वाटचाल करणाऱ्या उत्कर्ष पतसंस्थेचा विविध पुरस्कारांनी गौरव झाला. संस्थेचा व्यापक आणि ग्राहक, सभासद हिताचा दृष्टिकोन संस्थेच्या विस्तारास कारणीभूत ठरत आहे. दरम्यान, श्रीमती अनुराधा कोल्हापुरे यांनी संस्थेच्या पाचवड शाखेच्या यशस्वी विस्तारानंतर विविध ठिकाणी शाखा सुरू करत असल्याची माहिती देत सातारा शाखेच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण दिले. सहकारमंत्र्यांनी आवर्जुन या निमंत्रणाचा स्विकार करीत उत्कर्षच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे राहणार असल्याचे सांगितले. यावेळी उद्योजक शिवप्रकाश चव्हाण उपस्थित होते.