मुंबई – भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यामध्ये असलेले मतभेद दूर झाले असून, संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची शिष्टाई यशस्वी ठरल्याचे सांगितले जात आहे.
गेल्यावर्षी अमिरातीत झालेल्या आयपीएलनंतर जेव्हा रोहितची निवड ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी करण्यात आली नव्हती तेव्हा त्याचे कोहलीशी काही तरी बिनसले असल्याची चर्चा होती. पण आता कोहली व रोहित यांच्यामधील वाद मिटले असल्याचे सांगितले जात आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत कोहली व रोहित यांच्यात मैदानावर सातत्याने चर्चा होताना अनेकदा पाहिले गेले. त्यामुळे या दोन खेळाडूंमधील बेबनाव मिटल्याचे दिसून आले आहे.
शास्त्री यांनीच दोन्ही खेळाडूंशी चर्चा करून अंतर्गत वाद मिटवण्यात पुढाकार घेतल्याचे सांगितले जात आहे. कोहली व रोहित यांनी शास्त्री यांच्यासमोर आपले मुद्दे व मत मांडले. त्यानंतर या दोघांमधील बेबनाव मिटला असे बोलले गेले. शास्त्री यांनीच संघहित लक्षात घेत सातत्याने दोघांशी चर्चा करून मतभेद दूर केले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघातील वातावरण फारसे चांगले नव्हते. या दोन खेळाडूंमधील संबंध चांगले नव्हते. त्यामुळे अन्य खेळाडूंनाही त्याचा तणाव जाणवत होता. अखेर शास्त्री यांची मध्यस्थी यशस्वी ठरली व या दोन खेळाडूंचे मनोमिलन झाले. 2019 साली झालेल्या विश्वकरंडकानंतर रोहित नाराज झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्याचबरोबर आयपीएलनंतर तर या दोघांमध्ये विस्तवही जात नसल्याचे म्हटले जात होते. मात्र, संघहित महत्त्वाचे असल्याचे या दोघांनीही समजून घेतले आहे.
बायोबबलमुळे मने जुळली….
विविध मालिकांसाठी भारतीय संघाला गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने बायोबबलमध्ये राहावे लागले आहे. या काळात कोहली व रोहित यांच्यात पुन्हा एकदा संवाद सुरू झाला. आधीचे सर्व वाद किंवा काही मुद्दे या दोघांनीही सोडून देत संघहितासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला व अखेर शास्त्री यांची शिष्टाई यशस्वी ठरली.