श्रीनगर – जम्मू काश्मीरमधील एका युवकाला दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होण्यापासून परावृत्त करण्यात सुरक्षा दलांना यश मिळाले आहे, अशी माहिती पोलिसांनी आज दिली. पुलवामा जिल्ह्यातील या युवकाला अल बद्र या दहशतवादी गटामध्ये सक्रिय होण्यापासून वाचवण्यात आले आहे.
संबंधित युवक काही काळापूर्वी अल बद्र या दहशतवादी संघटनेमध्ये सामील झाला होता. मात्र जम्मू काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलांनी या युवकाच्या पालकांबरोबर केलेल्या कठोर परिश्रमानंतर या दहशतवाद्यांच्या जाळ्यातून आणखी एका युवकाची सुटका करण्यात यश मिळाले आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र सुरक्षिततेच्या कारणास्तव या युवकाची ओळख गुप्त राखण्यात आली आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलिसांचा प्रयत्न संघर्ष किंवा दहशतवादी कारवायांच्या विरोधात कारवाई करायच्यावेळी लोकांचे जीव वाचवणे आणि लोकांच्या मालमत्तेची हानी रोखणे हा उद्देश समोर ठेवला जात असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.
जम्मू काश्मीरमधील पोलिसांनी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या युवकांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले आहे. अगदी सुरक्षा रक्षकांबरोबरच्या चकमकीच्यावेळीही या वाट चुकलेल्या युवकांनी आत्मसमर्पण केले तरी त्याचा स्वीकारले जाईल, असे पोलिसांनी 2017 साली जाहीर केले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
या दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आवाहनानंतर बहुतेक दहशतवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहामध्ये सामील होण्याचा पर्याय स्वीकारला आहे.