पुणे – मुळशीकरांनी ठरविले आणि ते खरे झाले नाही, असे कधीही झाले नाही. भारतीय जनता पार्टीने तुमच्यातील एका मुलाला संधी देऊन मोठे केले आहे. त्यामुळे पक्षालाही आता अधिकाधिक मतदान करून मोठे करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी केले.
चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री आणि मंत्री म्हणून आतापर्यंत आपल्या तालुक्यातील विकासकामांना ५३५ कोटींचा भरीव निधी दिला असल्याची माहितीही त्यांनी दिली. भोर- मुळशी-मावळ तालुक्यांतील कार्यकर्त्यांचा मेळावा कोथरूडमधील आशिष गार्डन येथे आयोजित करण्यात आला होता. या वेळी भाजपा महायुतीचे कोथरूडचे उमेदवार चंद्रकांत पाटील, खडकवासल्याचे भीमराव तापकीर.
भोर-मुळशीचे शंकर मांडेकर, बाबासाहेब कंधारे, अंकुश मोरे, माउली साठे, धैर्यशील ढमाले, डॉ. संदीप बुटाला, गोविंद आंग्रे, सुशील मेंगडे, गणेश वरपे, अजय मारणे, नितीन शिंदे, नीलेश शिंदे, सौ. मोनिका मोहोळ, अल्पना वरपे यांच्यासह मुळशी तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, २०१७ च्या निवडणुकीत मुळशीकरांच्या निश्चयावर नगरसेवक होऊन मी राजकीय प्रवास सुरू केला. आज तुमचा मुळशीकर नरेंद्र मोदींसोबत काम करतो आहे. हे सर्व भारतीय जनता पार्टीने घडविले. चंद्रकांतदादा महायुती सरकारमध्ये अडीच वर्षे मंत्री आहेत.
या काळात तालुक्यातील अनेक कार्यकर्ते आणि सरपंच मुळशीच्या कामासाठी दादांना भेटत होते. त्यांची कामे दादांनी करून दिली आहेत. मागच्या काळातही सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणून ३८८ कोटींची रस्त्यांची कामे मुळशीत झाली. त्याआधी ६३ कोटी, आणि आता अडीच वर्षांत ८४ कोटींची विकास कामे त्यांनी केली.
शरद ढमाले यांच्यानंतर शंकर मांडेकर यांच्या रूपाने १५ वर्षांनंतर तालुक्याला नेतृत्व मिळाले आहे. त्यामुळे मुळशीकरांनी एकत्र आले पाहिजे, असे सांगून मोहोळ म्हणाले, महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याचे आम्ही ठरविले आहे. ज्यांचे कोथरूड आणि खडकवासला अशा शहरी भागात मतदान आहे, त्यांनी शहरात मतदान करावे. तर ज्यांचे ग्रामीण भागात मतदान आहे; त्यांनी जास्तीत जास्त मतदान करून महायुतीला विजयी करावे.
पाटील म्हणाले, कोथरूड आणि भोर विधानसभा मतदारसंघांवर मुळशीकरांचा प्रचंड प्रभाव आहे. २०१९ मध्ये मोहोळ यांच्या माध्यमातून आयोजित मेळाव्याची मदत झाली. त्या मेळाव्यात मी म्हणालो होतो, त्यानुसार तशी स्थिती आणण्यात देवेंद्र फडणवीसांना आणि मला संधी मिळाली. अडीच वर्षांपैकी एक वर्ष मला पुण्याचे पालकमंत्रिपद मिळाले, तेव्हा मुळशीची जी व्यक्ती काम घेऊन येईल, ती कामे पूर्ण केली.
उपक्रमांच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल कुटुंबांना मदत केली. अनेक मुलींना शिक्षणासाठी मदत करतो आहे. राज्यात महायुतीचे सरकार येणार, हे नक्की आहे. हरियाणामध्ये मतांचा टक्का वाढल्याने एनडीएचे सरकार आले. हे सर्वेक्षणाच्या पकडीत येत नाही.