आ. जयकुमार गोरे; दहिवडीत भाजप आणि महायुती घटक पक्षांचे आंदोलन
सातारा (प्रतिनिधी) – बॅंकेकडून नाकारला जाणारा कर्जपुरवठा, नकली बियाणामुळे सोयाबीनची दुबार पेरणी, अतिवृष्टी, खतांचा तुटवडा आणि काळाबाजार अशा अनेक संकटांनी राज्यातील शेतकरी बेजार झाले आहेत. त्यातच दुधाचे दर कमी झाल्याने शेतकरी पुरता कोलमडून गेला आहे. शासनाने संवेदनशिलता दाखवून दूधाच्या दरवाढीबरोबरच प्रतिलिटर 10 रुपये तसेच दूधभुकटीला प्रतिकिलो 50 रुपये अनुदान द्यावे, तसेच 30 रुपये लीटर दराने दूधाची खरेदी करावी अशी मागणी आ. जयकुमार गोरे यांनी केली. आंदोलनात संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध केला.
माण – खटाव विधानसभा मतदारसंघातील भाजप आणि महायुतीच्या घटक पक्षांच्यावतीने दहिवडी येथे दूध दरवाढ आणि दूध भुकटीला अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी आयोजित आंदोलनात ते बोलत होते. यावेळी भाजप सातारा जिल्हा प्रभारी सदाशिव खाडे, खटाव तालुकाध्यक्ष विकल्प शहा, माण तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ, नगराध्यक्ष सतीश जाधव, धीरज दवे, डॉ. काळे, गोरख मदने, सोमनाथ भोसले, विशाल बागल, हिम्मत कदम, बबन काळेल, गोरख शिंदे, काका माने, दादा बोराटे, काका बनसोडे, सिद्धार्थ गुंडगे, महेश कदम, इंगवले, सचिन पुकळे, आप्पा बोराटे, किरण गोरे, रवी तुपे, प्रशांत वायदंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. जयाकुमार गोरे म्हणाले, असंवेदनशील सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे.
राज्यात एक कोटी चाळीस लाख लीटर गाईच्या दुधाचे उत्पादन होते. 35 लाख लीटर सहकारी संस्था, 90 लाख लीटर खाजगी संस्था आणि डेअरीमार्फत खरेदी केले जाते. 15 लाख लीटर दूध शेतकरी स्वतः हॉटेल्स आणि घरगुती ग्राहकांना पुरवतात. शासकीय योजनेद्वारे अत्यल्प दूध खरेदी केले जाते. लॉकडाऊनच्या काळात दूध विक्रीमध्ये 30 टक्के घट झाली आहे. शहरांमधील हॉटेल्स, दुकाने बंद असल्याने दुधाच्या मागणीतही घट झाली आहे. खाजगी आणि सहकारी संस्थांकडून 15 ते 16 रुपये लीटर दराने दूध खरेदी केले जात आहे. दर कमी झाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. शासनाने 25 रुपये दराने 10 लाख लीटर दूध खरेदी करण्याची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात मंत्र्यांचे लागेबांधे असलेल्या दूध संघांकडून 7 लाख लीटर दूध खरेदी केले जात आहे. इतर संस्था आणि दूध उत्पादकांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे.