नवी दिल्ली ( subramanian swamy nitin gadkari ) – ‘देशातील करोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने बेजबाबदार निर्णय घेतले. यामुळेच देशाला दुसऱ्या लाटेचा प्रचंड फटका बसला आहे’, अशी टीका सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पातळीवरून करण्यात येत आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन, रेमडीसीवीर यांच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत असल्याचे चित्र असून यावरून सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र सरकारचे कान उपटले आहेत. अशातच आता भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, स्वामी यांनी देशातील करोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सूत्रे देण्याचा सल्ला मोदी सरकारला दिला होता. मात्र, त्याची मोदी सरकारकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. अशातच स्वामी यांनी आता सर्वोच्च न्यायालयाने ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात नेमलेल्या टास्क फोर्सवरून मोदी सरकारवर निशाणा साधलाय.
याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर केलेल्या ट्विटमध्ये स्वामी यांनी, “जर मोदींनी करोनाविरोधी लढ्याच्या नेतृत्वासाठी मी सुचवलेले गडकरींचे नाव स्वीकारले असते तर हा लढा केंद्र सरकारच्या नियंत्रणात राहिला असता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने एक समिती नियुक्त केली आहे. त्या प्रस्तावावर सॉलिसिटर जनरलने आत्मसमर्पणच केलं. एका लोकशाही देशात हा आदेश सरकारविरोधी आहे.” असा घणाघात केला आहे.
If Modi had listened to my Gadkari proposal, the Coronavirus war would have remained within the Government framework. Now SC has appointed a Committee which proposal the SG surrendered to—on instruction ( usually from HM). In a democracy this is a vote against Govt
— Subramanian Swamy (@Swamy39) May 9, 2021
दरम्यान, देशात करोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे अक्षरशः हाहा:कार माजला आहे. विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सध्या अनेक राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत. दिल्ली, व उत्तर प्रदेश सरकारने आजचा (रविवारी) राज्यातील निर्बंध (लॉक डाऊन) १७ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. एकीकडे देशातील अन्य राज्यांमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर जाणवू लागला असताना महाराष्ट्रात मात्र आता परिस्थिती सुधारू लागली आहे.