नवी दिल्ली- देशातील सर्वात संवेदनशील असलेल्या रामजन्मभुमी – बाबरी मशीदीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थांना आपला प्रगती अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार मध्यस्थांनी आपला अहवाल गुरुवार दि. 1 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाला सोपवला आहे.
आता या प्रगती अहवालानंतर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांचे घटनापीठ 2 ऑगस्ट (शुक्रवार) रोजी त्यावर करावयाच्या पुढील कारवाईच्या रूपरेषेबाबत विचार करणार आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान मध्यस्थ समितीने आपला अहवाल 31 जुलै ते 1 ऑगस्टपर्यंत सादर करावा म्हणजे आम्हाला पुढील प्रक्रिया सुरू करता येईल, असे पीठाने म्हटले होते. न्या. एस. ए. बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. ए. नझीर हे या पीठातील अन्य सदस्य आहेत.
मध्यस्थ समितीने दिलेला अहवाल पाहिल्यानंतर याप्रकरणी सुनावणीची गरज आहे का, त्याचा निर्णय 2 ऑगस्ट रोजी घेण्यात येईल. मध्यस्थ समितीचा प्रगती अहवाल पाहिल्यानंतर, त्या अहवालातील मुद्दे यापूर्वीच्या आदेशानुसार गोपनीय ठेवण्यात येतील, असे पीठाने यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान स्पष्ट केले होते. याप्रकरणी सुरू असलेली मध्यस्थीची प्रक्रिया 31 जुलैपर्यंत सुरू ठेवावी आणि त्यामधून काय निष्पन्न झाले त्याची माहिती 1 ऑगस्ट रोजी पीठाला द्यावी, अशी विनंती समितीला करण्यात आली होती.