पुणे – मे आणि जून महिन्यात शहरात झालेल्या मृत्यूंची कारणांसह माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पुणे महापालिकेस राज्यातील प्रमुख महापालिकांकडून मागविली आहे. शहरात जून महिन्यात कोंढवा आणि आंबेगावसह दत्तवाडी येथे सीमाभिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सुमारे 22 जणांचा मृत्यू झाला. तर मुंबई, नाशिक, नागपूरमध्येही अशाच प्रकारे भिंती कोसळून सुमारे 50 हून अधिक जणांना आपला जीव गमावावा लागला याची गंभीर दखल केंद्र शासनाकडून घेण्यात आली असून भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी या माहितीचे संकलन करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
राज्यात मे महिन्यात मान्सूनपूर्व (वाळवा)चा वादळी पाऊस सर्वसाधरणपणे 15 मेनंतर होतो तर त्यानंतर जून महिन्यात महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस होतो. त्यामुळे या दोन्ही महिन्यांत पुण्यासह राज्यभरात पावसाने होणाऱ्या दुर्घटनांची संख्या वाढते. त्यात, भिंत कोसळणे, डोंगर खचणे, इमारती कोसळने, पूर अशा घटनांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन भविष्यात या दोन महिन्यांमध्ये होणारे अपघात टाळण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या स्तरावर उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने 2010 पासून ते 2019 पर्यंत मे आणि जून महिन्यात शहरात होणाऱ्या मृत्यूंची संख्या तसेच त्यांच्या कारणांचा अहवाल मागविला आहे. याबाबतचे पत्र, नुकतेच विभागीय आयुक्त कार्यालयाकडून महापालिकेस पाठविण्यात आले असून तातडीने ही माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
मृत्यूंची होणार कारणमीमांसा
या माहितीमुळे पावसाळा सुरू होताना तसेच सुरू झाल्यानंतर शहरात होणाऱ्या मृत्यूंची कारणमीमांसा महापालिकेकडून देण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात या दिवसांमध्ये कशामुळे सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे ही माहिती या निमित्ताने का होईना पण समोर आल्यास महापालिकेसही आपल्या पातळीवर अशा दुर्घटनांना भविष्यात पायबंद घालणे शक्य होणार आहे. दरम्यान, ही माहिती आरोग्य विभागाकडे असल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागाने आरोग्य विभागाकडून माहिती मागविली आहे.