भोर पं. स. उपसभापती श्रीधर किंद्रे यांचे आवाहन
भोर- भोर तालुक्यात गेल्या 20 ते 25 दिवसात झालेल्या अतीवृष्टीने शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील भात, भुईमुग आणि कडधान्याचे मोठे नुकसान झाले असून यात प्रामुख्याने पश्चिम पट्यातील भात पिक आणि भाताच्या ताली पडल्या आहेत. तालुक्यातील ग्रामपंचायतींनी दि. 15 आँगस्टला स्वातंत्र्य दिनी नुकसानीचे पंचनामे करुन ते भोर तालुका पंचायत समितीला सादर करावेत, असे आवाहन उपसभापती श्रीधर किंद्रे यांनी केले आहे.
भोर तालुक्यात 20 हजार 200 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पिके घेतली जातात. त्यात 7 हजार 500 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रात भाताचे पिक, 4 हजार हेक्टरवर भुईमुग व 3 हजार हेक्टर वर सोयाबिन व इतर कडधान्याची पिके घेतली जातात. भोर तालुका अती दुर्गम डोंगरी तालुका असून येथील शेतकरी भात हेच पीक घेतात. या पिकावरच पश्चिम पट्यातील शेतकऱ्याचे अर्थिक गणित आवलंबून असते. मात्र शेतकऱ्यांच्या भात ताली पडून पिक वाहून गेले आहे तर काही भागात ते गाळात गाडुन गेले आहे. हेच पिक धोक्यात आल्याने शेतकऱ्यांचे अर्थिक गणितच कोलमडले आहे. अतिवृष्टीमुळे सर्व पिकांची नासाडी झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहे. त्यामुळे अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन संबंधीत शेतऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी भोर तालुका पंचायत समिती मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे उपसभापती किंद्रे यांनी सांगितले.
- पुरक व्यावसाय अडचणीत…
शेतकऱ्यांचा जोड धंदा म्हणुन दूध व्यवसायाकडे पाहिले जाते. मात्र जनावरांसाठी साठवून ठेवलेला सुका चारा पावसामुळे भिजून कुजला आहे. तर, ओला तारा अजून पुर्णपणे वाढलेला नसल्याने दुभत्या जनावरांना पुरेसा चारा मिळत नसल्याने याचा परिणाम दूध उत्पादनावर होत असल्याने शेतकऱ्याला मिळणारे चार पैसेही हाती येईनासे झाले आहे.