राजगुरूनगर-सांगली येथे जाऊन खेड तालुक्यातील 70 युवकांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी रक्तदान करून पूरग्रस्तांना एक प्रकारचा आधार दिला आहे. खेड पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर यांच्या नेतृवाखाली हा उपक्रम सांगली येथे राबविण्यात आला.
खेड पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर यांसह त्यांच्या 100 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी इस्लामपूर येथे जाऊन पूरगस्त नागरिकांना मदत केली. यावेळी सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान करून पूरग्रस्त सांगलीकरांना मदतीचा हात दिला आहे. इस्लामपूर येथील राजारामबापू सहकारी साखर कारखान्यात रविवारी (दि.11) हा उपक्रम घेण्यात आला. रक्तदान शिबिराला माजी मंत्री जयंत पाटील प्रतिक पाटील, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, युवा प्रदेश सचिव डॉ. शैलेश मोहिते यांनी उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक केले. पूरग्रस्त शेतकऱ्यांना सर्वच स्तरांतून वेगवेगळी मदत येत आहे; मात्र रामदास ठाकूर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून रक्तदान करून पूरग्रस्त शेतकऱ्यांना आधार दिला आहे. जखमी आजारी रुग्णांना याचा मोठा उपयोग होईल. रक्तदान हे सर्वात महान दान असून या उपक्रमाने पूरग्रस्त भारावले आहेत असे माजी मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.