अॅडलेड – कर्णधार विराट कोहलीने केलेल्या जबाबदार व संयमी फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात गुरूवारी पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने आपल्या पहिल्या डावात 6 गडी गमावून 233 धावा केल्या आहेत. दिवसअखेर रवीचंद्रन अश्विन 15 तर, वृद्धिमान साहा 9 धावांवर खेळत आहेत.
भारतीय संघाचा कर्णधार कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची सुरूवात खराब झाली. डावातील दुसऱ्याच षटकांत मिशेल स्टार्कने सलामीवीर पृथ्वी शॉचा त्रिफळ उडवला. त्यानंतर मयंक आग्रवालला साथ देताना चेतेश्वर पुजाराने संथ पण संयमी फलंदाजी केली. या जोडीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पॅट कमिन्सने आग्रवालचा 17 धावावंर त्रिफळा उडवत भारताची अवस्था 2 बाद 32 अशी बिकट केली.
वॉर्नची पुजारावर वर्णद्वेषी टीका
माजी कसोटीपटू व समालोचक शेन वॉर्न याने पुजारा फलंदाजी करताना त्याला उद्देशून वर्णद्वेषी टीका केल्यामुळे चांगलाच वाद रंगला आहे. आशिया खंडातील कोणत्याही खेळाडूचे नाव योग्यपणे उच्चारता येत नसल्याने इंग्लिश कौंटी स्पर्धेत किंवा इंग्लंड व ऑस्ट्रेलियात अशा खेळाडूला स्टिव या टोपण नावाने संबोधले जाते. तेच नाव घेत वॉर्नने पुजाराला लक्ष्य केले. अर्थात, त्यानंतर सोशल मीडियावर वॉर्नच्या माफीची मागणी सुरु झाली असून फॉक्स वाहिनीनेही दिलगिरी व्यक्त करावी अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वॉर्नच नव्हे तर इंग्लंड व ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू समालोचन करताना आशियाई खेळाडूंना याच नावाने संबोधतात असे वेस्ट इंडिजच्या टिनो बेस्ट व पाकिस्तानच्या राणा नविद उल हसन आणि अझीम रफिक यांनीही मत व्यक्त केल्याने आता वॉर्न अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कर्णधार विराट कोहलीने पुजाराला साथिला घेत तिसऱ्या गड्यासाठी महत्त्वपूर्ण 68 धावांची भागीदारी करताना संघाचे शतक फलकावर लावले. स्थिरावलेल्या पुजाराला 43 धावांवर ऑफ स्पीन गोलंदाज नाथन लायनने चकवले. त्यावेळी कोहलीने अजिंक्य रहाणेच्या साथीत पुन्हा एकदा चांगली भागीदारी केली. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 88 धावा जोडल्या.
ही जोडी ऑस्ट्रेलियासाठी डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच रहाणेने दिलेल्या चुकीच्या कॉलवर कोहली धावबाद झाला व ही जोडी फुटली. कोहलीने संयमी अर्धशतकी खेळी केली. त्याने तब्बल 180 चेंडूंचा सामना करताना केवळ 8 चौकारांच्या मदतीने 74 धावा केल्या. यंदाच्या मोसमात कोहलीला एकदाही शतकी खेळी करता आली नव्हती.
तो शतकाकडे वाटचाल करतानाच धावबाद झाल्याने या डावातही शतक साकार करण्यात अपयशी ठरला. कोहलीला बाद केलेला रहाणेही फारकाळ टिकला नाही. मात्र, त्याने विहारीच्या साथीत संघाचे द्विशतक फलकावर लावले. ऑस्ट्रेलियाने नवा चेंडू घेतल्यावर स्टार्कने त्याला 42 धावांवर पायचीत केले. त्यानंतर आलेल्या हनुमा विहारीनेही निराशा केली.
त्यानंतर तळात अश्विन व साहा यांनी दिवसातील उर्वरीत षटके खेळून काढताना संघाचे आणखी नुकसान होऊ दिले नाही. या जोडीने सातव्या गड्यासाठी 27 धावांची अभेद्य भागीदारी करत संघाला दिवसअखेर समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. अश्विन 15 तर, साहा 9 धावांवर खेळत आहेत. यजमान ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने 2 गडी बाद केले. कमिन्स, जोश हेझलवूड व नाथन लायन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक –
भारत पहिला डाव – 89 षटकांत 6 बाद 233 धावा. (विराट कोहली 74, चेतेश्वर पुजारा 43, अजिंक्य रहाणे 42, मयंक आग्रवाल 17, हनुमा विहारी 16, रवीचंद्रन अश्विन खेळत आहे 15, वृद्धिमान साहा खेळत आहे 9, मिशेल स्टार्क 2-49, पॅट कमिन्स 1-42, जोश हेझलवूड 1-47, नाथन लायन 1-68).