राहुल गोखले
झारखंड विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. एका ठिकाणी घडलेल्या घटनेचे पडसाद अन्य एखाद्या ठिकाणी देखील उमटू शकतात. हरियाणा आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने भव्य यशाची स्वप्ने पाहिली होती आणि दोन्ही ठिकाणी दोनतृतीयांश जागांवर विजय प्राप्त करण्याच्या वल्गना केल्या होत्या. ती स्वप्ने आणि त्या वल्गनाही फोल ठरल्या.
भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या कार्यकाळात नेहमीच निवडणूक-पवित्र्यात असतो, असे म्हटले जायचे. लोकसभा निवडणुकांपासून नगरपालिका निवडणुकांपर्यंत भाजप म्हणजे निवडणूक लढण्याची यंत्रणा बनली होती. सतत यश मिळाले की त्याची देखील कैफ येते आणि विधिनिषेध राहात नाही. भाजपची निवडणूक लढविण्याची यंत्रणा अतिशय नेटकी असा लौकिक. त्या तुलनेत विरोधक विस्कळीत. संघटन हे भाजपचे मजबूत; त्याउलट विरोधी पक्षांचे संघटन खिळखिळे. तेव्हा या सर्व पार्श्वभूमीवर भाजपचा वारू चौखूर उधळला होता याचे सर्व श्रेय मोदी-शहा यांचे नेतृत्व आणि त्यांच्या संघटन कौशल्याला आणि रणनीतीला दिले जाई यात आश्चर्यकारक काही नव्हते; परंतु या सगळ्यापेक्षा जनमत नावाचा घटक अधिक प्रबळ असतो याचे विस्मरण भाजपला झाले. नेतृत्व आणि संघटन हे दिसायला कितीही प्रभावी असले तरीही प्रत्यक्ष दैनंदिन आयुष्यात सामान्य माणसाला जे अनुभवयाला येते त्याने जनमत बनत असते. गेल्या डिसेंबरमध्ये तीन राज्ये भाजपला गमवावी लागली होती. परंतु त्याच तिन्ही राज्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ दिली आणि भाजपचा आत्मविश्वास पुन्हा दुणावला.
370 वे कलम रद्द करण्याचा निर्णय राजकीय प्रचाराच्या दिमतीला होताच. शिवाय अमेरिका दौऱ्यात मोदींची खुद्द राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेली स्तुती आसमंतात होती. तेव्हा खरे तर सर्व वातावरण भाजपला अनुकूल होते. शिवाय विरोधकांना फोडून स्वपक्षात घेण्याची अहमहमिका भाजप-शिवसेनेत लागली होती. त्या बाबतीत देखील भाजपची सरशी होती. एकूण विजय क्रमप्राप्त होता. मात्र हे सगळे असूनही जनमत काही अंगुळे पुरून उरले आणि त्याने भाजपचा रथ रोखला. झारखंडमधील निवडणुकांत भाजपला या उलथापालथीची जाणीव ठेवावी लागेल.
आपल्याकडे नेतृत्व आहे, संघटन आहे, विरोधी पक्ष विस्कळीत आणि निष्प्रभ आहेत आणि तरीही हरियाणा आणि महाराष्ट्रात अपेक्षित यश का मिळाले नाही याचे चिंतन भाजपने केले तर झारखंडचा गड राखणे भाजपला साध्य होईल. हरियाणा आणि महाराष्ट्रात देखील भाजपने ज्या गफलती केल्या त्याकडे भाजप नेतृत्वाने गांभीर्याने पाहिले पाहिजे. बहुधा या गफलतींमधील सर्वांत मोठी गफलत कुठली असेल तर ती होती फाजील आत्मविश्वासाची. झारखंडमध्ये भाजप बहुधा तोच फाजील आत्मविश्वास बाळगून आहे. तेथील 81 सदस्यीय विधानसभेत भाजपने 65 जागांवर विजय मिळविण्याचे ध्येय ठेवले आहे. पक्षाने मोठी स्वप्ने पाहावीत हे खरे; परंतु वास्तवाची जाणीव न ठेवता अपेक्षा वाढायला लागल्या की अपेक्षाभंगाची शक्यता अधिक असते. हरियाणा आणि महाराष्ट्रात भाजपला तेच भोवले आणि झारखंडमध्ये भाजपने 65 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे तेही कार्यकर्त्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी आहे की अवास्तव कल्पनाभरारी आहे हे तपासून पाहिले पाहिजे.
हरियाणा आणि महाराष्ट्रात भाजपने केलेली दुसरी मोठी गफलत म्हणजे विरोधकांना फोडून त्यांना आपल्या पक्षात सर्रास दिलेला प्रवेश आणि त्यापुढे जाऊन घाऊक प्रमाणावर अशा आयारामांना दिलेली उमेदवारी. महाराष्ट्रात विखे पाटील यांच्यापासून उदयनराजे यांच्यापर्यंत अनेकांना भाजपने पक्षात प्रवेश दिला. हे जनतेच्या आणि मुख्यतः भाजप-सहानुभूतदारांच्या देखील किती पचनी पडले हे कळणे कठीण. परंतु एके काळी अशा फोडाफोडीतून मिळालेल्या सत्तेला चिमट्याने देखील स्पर्श करणार नाही असे म्हणणारे वाजपेयी पक्षाचे प्रतिनिधित्व करीत. भाजपचा तो चेहरा बदलून सत्तेसाठी काहीही करणारा चेहरा बनला. तो अधिक आक्रमक आहे. आत्मविश्वास आणि अभिनिवेश, आग्रह आणि आक्रमकता यात फरक असतो. भाजपने सलग दोनदा केंद्रात सत्ता मिळविली; पण याचा अर्थ राज्या-राज्यात त्याची पुनरावृत्ती होईल असे संभवत नाही. पण विरोधक नकोतच अशी भूमिका स्वीकारून भाजपने राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील दिग्गजांना गळाला लावले. यामुळे भाजपचा आत्मविश्वास दुणावला आणि आता विजय म्हणजे केवळ औपचारिकता असे पक्षाला वाटू लागले. पण जनतेला ही अमर्याद फोडाफोडी रुचत नाही. विचारधारा कितीही पातळ झाल्या असल्या तरीही स्वार्थ ही विचारधारा होऊ शकत नाही. जनतेला नैतिकतेशी झालेला खेळ भावत नाही.
ऑक्टोबर महिन्यात झारखंडमध्ये मोठी पक्षांतरे झाली आणि निवडणुका उंबरठ्यावर असताना झालेली पक्षांतरे ही विचारधारेच्या जवळकीतून झालेली असतात यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. गेल्या महिन्यात झारखंडमध्ये विरोधी पक्षाच्या सहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात कॉंग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रत्येकी दोन; झारखंड विकास मोर्चाचा एक आणि एक अपक्ष असा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत झारखंडमध्ये चौदापैकी बारा जागा रालोआने जिंकल्या होत्या. तेव्हा आता त्याची पुनरावृत्ती सहज शक्य आहे, असे भाजपला वाटते आहे. पण इतकी खात्री ज्या पक्षाला असते त्या पक्षाला विरोधक फोडावे का लागतात हा मूलभूत प्रश्न आहे. महाराष्ट्रात भाजपमधील आयारामांचा दारुण पराभव मतदारांनी केला आहे याचे विस्मरण भाजपने झारखंडमध्ये होऊ देता कामा नये.
तिसरा मुद्दा प्रचारात कोणते मुद्दे आणायचे याचा. विधानसभा निवडणुकीत 370 वे कलम हा विषय प्राधान्याचा होऊ शकत नाही याचे भान भाजपला राहिले नाही. झारखंडमध्ये मुख्यमंत्री दास यांनी विकास आणि राष्ट्रवाद हे प्रचाराचे मुख्य मुद्दे राहतील असे म्हटले आहे. झारखंड राज्यासमोरील समस्या आणि त्यांचे निराकरण हे विधानसभा निवडणुकांचे प्रचारमुद्दे असावयास हवेत. झारखंडची निवडणूक जिंकायची तर कोणती पथ्ये पाळावी लागतील याचा धडा एका अर्थाने हरियाणा आणि महाराष्ट्राने भाजपला दिला आहे. त्याकडे दुर्लक्ष करून जुनाच हेका चालू ठेवला तर या दोन राज्यातील भाजपच्या स्थितीची पुनरावृत्ती झारखंडमध्ये झाल्याखेरीज राहणार नाही.