वानवडी – दिव्यांगांनी आत्ताचा काळ ओळखून आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देत गुगल, इंटरनेटच्या माध्यमातून नवनवीन अभ्यासी ज्ञान आत्मसात करून शिक्षणाचा पाया रोवत तसेच स्पर्धा परीक्षांना सामोरे जात आत्मविश्वासाने उभे राहिले पाहिजे, असे मत वानवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी व्यक्त
केले.
कम्युनिटी पोलीस अंतर्गत सुरू केलेल्या उपक्रमाला अनुसरून वानवडीतील अपंग कल्याणकारी शिक्षण संस्थेस सदिच्छा भेट देत दिव्यांग मुलांना स्पर्धा परीक्षा, डिजिटल इंडिया यासंदर्भात शिक्षणाचे मार्गदर्शन करत असताना पाटील बोलत होते. यावेळी दिव्यांगाना एमपीएससी, यूपीएससी तसेच बॅंकेच्या स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन केले. तसेच पोलीस खात्यात सुद्धा दिव्यांगांसाठी क्लार्क या पदावर राखीव जागा असल्याचे सांगितले. तसेच पोलीस हा देखील एक माणूसच असून तो माणसांच्या स्वंरक्षणासाठी सदैव तत्पर असतो. त्यामुळे पोलिसांना घाबरू नका. पोलिसांच्या बाबतीतील असलेली भीती मनातून काढावी, असे आवाहन पाटील यांनी केले. पोलीस म्हटले की, लहानतला लहान आणि मोठ्यातला मोठा व्यक्ती ही सुरुवातीला घाबरत असते; परंतु दिव्यांग मुलांनी न घाबरता पोलीस अधिकारी जे काही सांगत आहे, त्याकडे लक्ष दिले, असे त्यांनी सांगितले.