पुणे – राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीप्रमाणेच आता बारावीच्या गुणपत्रिकेवर “अनुत्तीर्ण’ किंवा “नापास’ हा शिक्का पुसला जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने प्रसिद्ध केला. त्यामुळे आता दहावीप्रमाणे बारावीमध्ये तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेवर “कौशल्य विकासास पात्र’ असा शेरा देण्यात येणार आहे.
कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने दहावी, बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यासाठी अशा विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करण्यासाठी कौशल्य सेतू कार्यक्रम योजना राबविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार यापुढे दहावीप्रमाणेच बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेवर अनुत्तीर्ण शेरा न देता कौशल्य विकासास पात्र असे नमूद करण्यात येणार आहे. यापूर्वी शिक्षण विभागाने 27 सप्टेंबर 2018 रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करून दहावी परीक्षेत तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयांमध्ये उत्तीर्ण न होऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण शेरा न देता कौशल्य विकासास पात्र असे नमूद केले आहे. त्यानंतर आता बारावी परीक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, शिक्षण विभागाच्या निर्णयानंतर कौशल्य विकास व उद्योजकता विभागानेही विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.