राज्य सीईटी सेलचे महाविद्यालयांना आदेश
पुणे – कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश मिळाला आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांना महा विद्यालयात उपस्थित राहून प्रवेश निश्चित करण्यास अडचणी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रवेश देतेवेळी कागदपत्रे अपलोड केली नाहीत म्हणून प्रवेश रद्द करू नयेत. मूळ कागदपत्रे उपलब्ध असल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, असे सक्त आदेश राज्य सीईटी सेलचे आयुक्त चिंतामणी जोशी यांनी दिले आहेत.
कृषी प्रथम वर्ष प्रवेशासाठी पहिली फेरी जाहीर झाली. त्यात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात जाऊ न प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महा विद्यालयात येऊन प्रवेश घेणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडवणूक न करता त्यांना प्रवेश देण्यात यावा.
विद्यार्थ्यांने कागदपत्रे अपलोड केलेली नसल्यास मात्र प्रवेश देतेवेळी विद्यार्थ्यांकडे आवश्यक ती मूळ कागदपत्रे उपलब्ध असल्यास त्यास प्रवेश देण्यात यावा. केवळ कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत अथवा चुकीच्या ठिकाणी अपलोड केलेली आहे, या कारणावरून प्रवेश रद्द करू नयेत. प्रवेशप्रक्रिया संपल्यानंतर अशा प्रकारची प्रवेश राज्य सीईटी सेलकडे सादर करावीत.
दरम्यान, अंतिम गुणवत्ता यादीत प्रवर्गात बदल असल्यास आणि त्याविषयी विद्यार्थ्यांकडून हरकत उपस्थित केल्यास, छाननी अधिकाऱ्यांच्या समन्वयाने त्यात सुधारणा करावी, असेही राज्य सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.